मुंबई - आज मुंबईत एकच चर्चा होती, ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून होत असलेल्या चौकशीची. तब्बल ८ तास राज ठाकरेंची ईडीकडून आज चौकशी करण्यात आली. चौकशी संपल्यानंतर राज ठाकरे कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी आल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
राज ठाकरे यांची ईडीने ८ तास चौकशी केल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास ते कृष्णकुंज येथे कुटुंबासोबत पोहोचले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ईडीकडून त्यांची पुन्हा चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. ईव्हीएम विरोधी बोलत असल्यामुळे राज ठाकरे यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली असल्याचे वक्तव्य कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.