मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी ( Congress leader Rahul Gandhi ) यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये ( Bharat Jodo Yatra ) अनेक लोक सहभागी होत आहेत विविध पक्षांचे नेते आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या यात्रेत सहभागी झाल्याचे चित्र आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्रात या यात्रेला किती प्रतिसाद ( Rahul Gandhi India Jodo Yatra Response ) मिळणार अशी शंका व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रातही या यात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. हा प्रतिसाद केवळ राजकीय, सामाजिक स्तरातूनच नाही तर विद्यार्थी आणि महिला मधूनही मिळाला असल्याची प्रतिक्रिया यात्रा जवळून पाहिलेल्या ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
राहुल गांधी यांची प्रतिमा बदलली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिमा या यात्रेदरम्यान बदलली आहे. राहुल गांधी एक प्रगल्भ आणि जनतेविषयी प्रेम असलेला जनतेच्या समस्या जाणून घेणारा प्रगल्भ नेता अशी नवी ओळख या भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांची निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांना केवळ राजकीय पक्षांकडूनच मदत मिळत आहे असे नाही तर सामाजिक संघटना विविध समाजाच्या लोकांकडून तसेच विद्यार्थी तरुण वर्ग आणि विशेषता महिलांकडून मोठ्या प्रमाणात या यात्रेचे स्वागत होत आहे त्यामुळे राहुल गांधी यांनी भारत जोडो या यात्रेमुळे एक नवी राजकीय सुरुवात केल्याचे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजय मिस्किन यांनी व्यक्त केले.
सर्वच मतदारसंघात चांगला प्रतिसाद - राहुल गांधी यांना केवळ काँग्रेसच वर्चस्व असलेल्या मतदारसंघांमध्येच नाही तर विदर्भ आणि मराठवाड्यात ज्या ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे प्रबल्य आहे अशा मतदारसंघांमध्येही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे सर्वच जनता त्यांचे स्वागत करत आहे याचा त्यांना नक्कीच फायदा होईल असेही मिस्कीन यांनी सांगितले. आपण स्वतः या यात्रेत सहभागी झालो होतो त्यावेळी यात्रेला मिळणारा प्रतिसाद हा अभूतपूर्व असल्याचे पाहायला मिळाले एक महिला आपल्या दोन लहान मुलांसोबत या यात्रेत चालताना दिसली आणि जोपर्यंत आपण थकणार नाही तोपर्यंत चालत राहणार असा निर्धारही तिने व्यक्त केल्याचे मिस्कीन यांनी सांगितले.
राहुल गांधींनी काढले वातावरण ढवळून - दरम्यान राहुल गांधी यांच्या यात्रेला मराठवाडा आणि विदर्भात मिळालेला प्रतिसाद पाहता राहुल गांधी यांनी सर्व वातावरण ढवळून काढले आहे. अशा पद्धतीचा प्रतिसाद त्यांना मिळेल अशी अपेक्षा नसताना त्यांनी केलेली ही कामगिरी खूपच महत्त्वाची आहे. आगामी निवडणुकांमध्ये याचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे सध्या जरी गुजरात मध्ये निवडणुका असल्या तरी महाराष्ट्रामध्येही याचा प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही असे मत राजकीय विश्लेषक दिलीप सपाटे यांनी व्यक्त केले आहे.