मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या आपल्या पहिल्याच जाहीर सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. चौकीदार केवळ चोरच नाही, तर भित्रेदेखील आहेत, अशा शब्दांत गांधी यांनी मोदींच्या कार्यशैलीवर हल्ला चढवला.
आजवर मोदींचा उल्लेख 'चौकीदार ही चोर है' असा करणाऱ्या गांधी यांनी आज थेट मोदींना 'डरपोक' (घाबरट) संबोधले. यावेळी राहुल गांधींनी राफेल प्रकरणी मोदींनी आपल्या प्रश्नांना कशी बगल दिली, हे मोदींचा अभिनय करून दाखवले. त्यामुळे मैदानावर एकच हास्यकल्लोळ झाला! हिंमत असेल, तर मोदींनी भ्रष्टाचारावर चर्चा करावी, असेही आव्हान गांधी यांनी मोदींना दिले.
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आज झालेल्या सभेला प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. राहुल गांधी यांच्या भाषणाची आक्रमक शैली, व्यंग आणि मार्मिक टीका यांच्यामुळे प्रचंड संख्येने जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी राहुल गांधी यांनी मोदींवर देशात २ प्रकारचे भारत निर्माण करत असल्याचा आरोप करत त्यांनी छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना साद घालण्याचा प्रयत्न केला. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हीच विजयी होऊ, असा दावाही केला.
अंबानीचाही चोर म्हणून उल्लेख
राहुल गांधी यांनी आजच्या जाहीर सभेत राफेलचा मुद्दा वारंवार उपस्थित करून मोदी आणि अनिल अंबानी यांच्यावर हल्ला चढवला. हा हल्ला चढवताना आक्रमक झालेल्या गांधी यांनी अंबानी यांनाही चोर असल्याचे संबोधले!
गांधी म्हणाले, की एक भारत अंबानींचा असून यात मूठभर २० ते २५ लोकांसाठी सत्ता राबवली जाते आणि दुसरा भारत शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारा आहे. देशातील मूठभर १५ सर्वात श्रीमंत लोकांचे साडेतीन लाख कोटी कर्ज माफ केले आहे. मात्र, लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांचे एक रुपया तरी कर्ज माफ केले का? असाही प्रश्न गांधी यांनी श्रोत्यांना विचारला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'चौकीदार ही चोर है'च्या घोषणांनी मैदान दणाणून सोडले.
अनिल अंबानी सारख्या चोरांना ३५ हजार कोटी दिले, तेव्हा टाळ्या का वाजल्या नाहीत?
शेतकऱ्यांना रोजचे १७ रुपये दिले, तेव्हा लोकसभेत भाजप खासदारांनी टाळ्याचा कडकडाट केला. मात्र, जेव्हा अनिल अंबानी सारख्या चोरांना ३५ हजार कोटी दिले, तेव्हा टाळ्या का वाजल्या नाहीत? नीरव मोदींना ३० हजार कोटी दिले, तेव्हा टाळ्या का वाजल्या नाहीत? विजय मल्ल्याला १० हजार कोटी दिले, तेव्हा टाळ्या का वाजल्या नाहीत? असे प्रश्न उपस्थित करत गांधींनी भाजपवर टीका केली.