मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना २ ऑक्टोबरपासून देशात प्लास्टिक बंदी कायदा लागू करण्यात येईल, असे म्हटले होते. या निर्णयाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्वागत केले आहे. तसेच याबाबत ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन देखील केले आहे.
गेल्या २ वर्षांपासून मी प्लास्टिक बंदीवर काम करत आहे. शहरात व राज्यात आपल्याकडे प्लास्टिक बंदी झाली आहे. राज्यातही प्लास्टिक बंदी कायदा झाल्यानंतर कचऱ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली. शहरातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक हद्दपार झाले आहे. देशात प्लास्टिक बंदी कायदा आणल्यास चांगला परिणाम होऊ शकतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
प्लास्टिक सोडणे गरजेचे
२० राज्यात प्लास्टिक बंदी आहे. त्यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध होतो. सर्व प्लास्टिक वाईट नाही. मात्र, सिंगल प्लास्टिकवर बंदी आणण्याची गरज आहे. संपूर्ण देशभरात प्लास्टिक बंदी आणली पाहिजे. मात्र, सर्व प्रकारचे प्लास्टिक बंद करून चालणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
तसेच, कचरा वर्गीकरणातून ७ हजार टन कचरा कमी झाला. विमानतळ, रेल्वे स्थानकात प्लास्टिक बंदी आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. प्लास्टिक बंदीबाबत सर्वत्र जनजागृती अभियानही सुरू आहे. यात विशेषतः लहान मुलांमध्ये प्लास्टिकच्या वापरासंदर्भात मानसिकता बदलण्यास सुरुवात झाली आहे.
तेजस ठाकरे यांनी दोन नवीन पालीच्या प्रजातीचा शोध लावला
त्याचबरोबर तेजस ठाकरे यांनी दोन नवीन पालींच्या प्रजातीचा शोध लावला आहे. याबाबत आदित्य यांनी तेजसचे अभिनंदन केले आहे. आम्ही आमदार शोधत आहे, तो पाली शोधत आहे. तो सध्या खेकडे व अजगराच्या नवीन जातींचा शोध घेतो आहे. त्याच्याकडून मला पर्यावरणाबाबत प्रेरणा मिळते, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
त्यावर मी सविस्तर अहवाल गडकरींना देईन
५८ हजार कोटी रुपयांचे पालिकेचे बजेट असतानाही मुंबईत पाणी कसे तुंबते, असा गडकरी यांनी शुक्रवारी पालिका प्रशासन व शिवसेनेवर टोला हाणला होता. याबाबत मी गडकरींना सविस्तर अहवाल देईन, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.