मुंबई - मुलुंड परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी 'अथक प्रतिष्ठान'ने गुढीपाडव्यानिमित्ताने मुलुंड प्लास्टिक मुक्तीची हाक दिली होती. शनिवारी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत प्लास्टिक मुक्त भारत तसेच मुलुंड प्लास्टिक मुक्त करण्याचीही हाक देण्यात आली होती.
मराठी नववर्षानिमित्त शोभायात्रेत अथक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. प्रतिष्ठानच्या अतुल कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेरा भारत स्वच्छ भारतसह प्लास्टिक मुक्त मुलुंड हा संदेश दिला आहे. महाराष्ट्र राज्यात प्लास्टिक बंदी आहे, पण जे प्लास्टिक बंद झाले ते फक्त 'वन टाईम' वापरले जाणारे प्लास्टिक आहे. जे की फक्त पाच ते सहा टक्के प्लास्टिक आहे. बाकी ९५ टक्के प्लास्टिक आपल्या घरात येत आहे . त्याअनुषंगाने प्लास्टिक मुक्त मुलुंड ठेवण्यासाठी ही मोहीम चालू असल्याचे अतुल कस्तुरे म्हणाले. मुलुंडमध्ये आमचा पायलट प्रोजेक्ट चालू आहे. जेणेकरून आम्ही महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्लास्टिक गोळा करून प्लास्टिक पुण्याला पाठवतो जिथे प्लास्टिकचे रूपांतर हायस्पीड डिझेलमध्ये करण्यात येते, म्हणजेच त्याला इंसोल्युशन देण्यात येते. हे प्लास्टिक निसर्गात परत जाणार नाही व पुढे त्याचे डिझेलमध्ये रुपांतर होईल. मुलुंडमधील जवळपास शंभर सोसायट्या आणि सर्वच शाळांचा सहभाग असतो. आम्ही मागील २६ महिन्यांपासून हा कार्यक्रम चालू केला आहे.
या कामी स्थानिक नगरसेवक आणि सगळ्याच पक्षांची आम्हाला मदत मिळत असल्याचे प्रतिष्ठाणच्या वतीने सांगण्यात आले. या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेता सबंध मुलुंडकरांनी या कामी सहकार्य करावे, असे आवाहनही प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.