मुंबई - नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आजही देशासह राज्यभर आंदोलने झाली. अनेक ठिकाणी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, या सरकारचा निषेध करण्यात आला. हा कायदा म्हणजे देशाच्या एकात्मतेला धोका असल्याचे मत अनेक आंदोलकांनी व्यक्त केले आहे. अनेक ठिकाणी इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरमच्या घोषणा देण्यात येत आहेत.
पाहा राज्यात कुठे-कुठे झाली आंदोलने
बुलडाणा
एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात एमआयएमच्या वतीने बुलडाणा जिल्हा कचेरीसमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी दोन्ही कायद्याची प्रत फाडून सरकारचा निषेध नोंदवला. तसेच एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी मुंडन करून निघालेले केस पंतप्रधानांना पाठवले.
नाशिक (नांदगाव)
संविधान बचाव समिती जमेतूल उलेमा, नांदगांव शहर शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचीत बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,यासह सर्व धर्मीय जनता व संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने आज भव्य असा मुकमोर्चा काढण्यात आला. जामा मशीद येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. नमाजानंतर मुस्लिम बांधवानी काळ्या फिती लावून मोर्चा काढला.
बीड
भारतीय नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी बीड शहर बंद ठेऊन मोर्चा काढण्यात आला. मात्र, मोर्चादरम्यान अचानक गोंधळ सुरू झाला. या गोंधळाचे रुपांतर दगडफेकीत झाली. यामध्ये संतप्त मोर्चेकऱ्यांनी दगडफेक करत अनेक वाहनांची तोडफोड केली. ही घटना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात घडली.
लातूर
आज उदगीरमध्ये भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी ग्राहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चौभार ते उपजिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान काढण्यात आलेल्या मोर्चात गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यवतमाळ (उमरखेड)
नागरिकता संशोधन कायद्याच्या विरोधात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनाच्या वतीने उमरखेड येथील उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने संविधानमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला असल्याचा ठपका ठेवत हा अन्याय सहन केल्या जाणार नसल्याचे वक्तव्य आंदोलकांनी केले.

रायगड
संसदेमध्ये नुकताच संमत झालेल्या एनआरसी आणि कॅब विधेयकाच्या विरोधात आज रायगडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये बहुजन मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून बहुसंख्य मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. केंद्र सरकारने एनआरसी आणि कॅब ही घटनाविरोधी विधेयक त्वरित रद्द करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पुणे
पुण्यात मुस्लिम समाजाकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यावेळी विविध धर्मगुरूंनी उपस्तिथांना संबोधित केले.
ठाणे
शांत राहणार नाही आणि हिंसा पण करणार नाही असे म्हणत ठाण्यातील मुस्लिम समाजाने शांततेत निदर्शने केली. ठाण्यातील राबोडी येथील ऐतिहासिक जामा मशिदीजवळ हजारो मुस्लिम बांधवानी एकत्रित येऊन सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात निदर्शने केली.

नांदेड
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आयोजीत धरणे आंदोलनाला नांदेडमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलनकर्त्यांच्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. या धरणे आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते. या आंदोलनात भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते सहभागी झाले. प्रमुख नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाषणे केली.
मुंबई
पश्चिम उपनगरातील मालाड, मालवणी लालजीपाडा या भागातील सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरून दोन्ही कायद्यांना विरोध केला. हा कायदा रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या कायद्यामुळे मुस्लिम व हिंदू यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचा आरोप संघटनांनी केला. मात्र, या आंदोलनात आमच्यासोबत हिंदू बांधव देखील असल्याची भावना यावेळी मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली.

अकोला
एनआरसी कायदा अस्तित्वात आल्याने मुस्लिम समाजावरच नव्हे, तर अनुसूचित जाती जमातीवरही अन्याय होत आहे. त्यामुळे हा कायदा मुस्लिम विरोधी नाही तर बहुजन विरोधी असल्याचा आरोप बहुजन क्रांती मोर्चाने केला. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या कायद्यामुळे देशात अशांतता निर्माण झाली आहे समाजामध्ये विभाजन करण्याचा हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.

पुणे (पिंपरी चिंचवड)
पिंपरी-चिंचवड शहरात कूल जमाआती तंझिम यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या आंबेडकर चौकात हजारो च्या संख्येने मुस्लिम बांधवांनी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला.
उस्मानाबाद
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शहरातील व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. दिवसभर आपली दुकाने बंद ठेवून या व्यापाऱ्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवला. तसेच जिल्ह्यातील विविध विद्यार्थी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.

लातूर (निलंगा)
निलंग्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलने केली. यावेळी मोदी शाह मुर्दाबाद म्हणत या कायद्याला विरोध केला. हम सब एक है, अखंड हिंदुस्थान की जय अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.