मुंबई - राज्य सरकारने आजपासून काही प्रमाणात विमान सेवा सुरू केली आहे. मात्र, आज पहिल्याच दिवशी दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान पूर्वसूचना न देता रद्द करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
मुंबई विमानतळाच्या बाहेर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. सुरक्षा दलाला थर्मल स्क्रीनिंग करावी लागणार असल्याने प्रवाशांनी विमानतळावर प्रवेश करण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत होता. तसेच प्रत्येक प्रवाशाने त्यांच्या मोबाइल फोनवर आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केले आहे का? ते तपासले जात आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईत दळणवळणाची साधने उदाहरणार्थ ओला, उबेर आणि टॅक्सी सेवा प्रभावित झाल्याने विमानतळावरील काही प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थानी कसे पोहोचावे? असा सवाल देखील प्रवाशांनी उपस्थित केला.
दरम्यान, अखेर मुंबईत काही प्रमाणात विमान वाहतूक करण्याला शासनाकडून हिरवा कंदील मिळाला. आजपासून काही प्रमाणात हवाई वाहतूक सुरू झाली. तसेच मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज 25 विमानांच्या टेक ऑफ आणि 25 विमानाच्या लँडिंगला परवानगी दिली आहे. विमान कंपन्यांना दिलेल्या स्लॉटनुसार उड्डाण करावे लागणार आहेत. विमानतळावर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करू नये यासाठी विमानतळ अधिकारी प्रयत्न करत आहेत.