मुंबई - कोरोना रूग्णसंख्या वाढत असलेल्या राज्यांना अतिरिक्त वैद्यकीय ऑक्सिजन पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याचा दावा नुकताच करण्यात आला होता. राज्यात ऑक्सिजन उत्पादन क्षमतेपेक्षा मागणी अधिक आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा नियमित पुरवठा करणे हे सध्या भारतात आरोग्य व्यवस्थेसमोरचं मोठे आव्हान बनले आहे. विशेषतः महाराष्ट्रात, ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. ऑक्सिजनच्या तुडवड्यासंदर्भात ऑल इंडिया फूड अँड ड्रग लायसन्स फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ऑक्सिजनच्या तुडवड्यासंदर्भात ऑल इंडिया फूड अँड ड्रग लायसन्स फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले, की महाराष्ट्र राज्यातील FDAमधील अधिकारी ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भात अधिक गंभीर नाही. त्यांच्या चुकीच्या कारभारामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. तसेच गेल्या एक आठवड्यापासून ऑक्सिजन उद्योगधंद्यांमध्ये वापरणे बंद करा, अशी सूचना राज्य सरकारने काढलेली असताना देखील काही उद्योग व्यवसायांमध्ये अजून सुद्धा ऑक्सिजनचा वापर केला जात आहे. हा संपूर्ण कारभार लपून होत असल्यामुळे या संदर्भात राज्य शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात ऑक्सिजनचा पुरवठा हा योग्य प्रमाणात होईल आणि लोकांचे प्राण वाचतील याकडे शासनाने सगळ्यात जास्त लक्ष देणे गरजेचे आहे, असेही पांडे यांनी सांगितले आहे.