मुंबई - विविध मागण्यांना घेऊन शिवसेना भवनावर गेलेल्या शिक्षक महिलांना शिवसेना भवनातही घेतले नाही. तब्बल २ तास या महिला शिक्षक शिवसेना भवनासमोर उन्हात उभ्या होत्या. सेनेचे आमदार अनिल देसाई यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घालून देऊ, असे या शिक्षकांना सांगितले होते. मात्र, शिवसेनापक्षप्रमुख किंवा अनिल परब यापैकी कुणीही त्यांच्या भेटीसाठी आले नाही. अखेर सेनेचे कार्यालयीन पदाधीकारी पंडित यांनी महिला शिक्षकांची भेट घेतली.
गेले २५ दिवस मुंबईतील विनाअनुदानित शिक्षक महिला आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेकडे आपले गाऱ्हाणे मांडत आहे. किमान वेतन लागू करावे ही या महिला शिक्षकांची प्रमुख मागणी आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानीही महिलांनी आंदोलन केले. शिक्षण समितीचे अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी या महिलांची समजूत घालून ४ दिवसात पक्षश्रेष्टींच्या मध्यस्थीने तोडगा काढण्याचे आश्वासन या महिलांना दिले होते. मात्र, ४ दिवस उलटून गेल्याने महिला हवालदील झाल्या होत्या.
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले, मुंबई महापालिकेचाही अर्थसंकल्प मंजूर झाला. स्थायी समिती सभा, महासभा शिक्षकांच्या अनुदानाच्या मागणीसाठी तहकूब झाली. पण त्यांचा प्रश्न काही सुटला नाही. आता लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता जाहीर होऊन या शिक्षकांचा प्रश्न लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या स्थितीतही सरकार दरबारी या शिक्षकांची दाद राजकीय पक्ष घेत नसल्याचे समोर आले आहे. त्यांना पक्ष कार्यलयाबाहेर तासंतास उभे राहण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, महापौर दालनात महिला शिक्षक प्रतिनिधी, महापौर आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यात चर्चा झाली असली तरी अद्याप अंतिम तोडगा निघाला नसून यासंदर्भात एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.