मुंबई : मुंबई-पुणे-मुंबई ही चित्रपट मालिका, प्रेमाची गोष्ट, ती सध्या काय करते... या प्रेमकथांमुळे सतीश राजवाडे (Satish Rajwade) हे नाव सर्वश्रुत आहे. त्यांच्या दिग्दर्शनाखाली येणाऱ्या 'ऑटोग्राफ' ची (New Marathi Film Autograph) निर्मिती प्रसिद्ध निर्मितीसंस्था एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने केली आहे. या चित्रपटाचे टीझर नुकतेच प्रदर्शित (Teaser released) करण्यात आले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरच्या माध्यमातून या चित्रपटातील महत्त्वाच्या काही प्रसंगांबरोबरच प्रतिभावान अभिनेत्यांचा सहभाग समोर येतो आहे. आणि रसिकांच्या या चित्रपटाकडून असेलेल्या अपेक्षा आणखी वाढतात आहे. 'ऑटोग्राफ’ या नावाचा कथेशी काय संबंध, याबाबत टीझरमध्ये पुरेशी माहिती मिळत नाही, पण त्याचे महत्व मात्र टीझर अधोरेखित करतो.
![Marathi Film Autograph](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16728688_auto-2.jpg)
या टीझरमध्ये अंकुश चौधरीसह अमृता खानविलकर, उर्मिला कोठारे आणि मानसी मोघे काही महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये दिसतात. त्यातून ही एक सांगीतिक प्रेमकथा आहे आणि तिला विरहाची किनार आहे, हे ध्यानात येते. टीझरमधून जे समोर येते ते हे की, ही काही केवळ एक प्रेमकथा नाही तर, त्यापेक्षाही बरेच काही आहे. ‘ऑटोग्राफ’ ही नातेसंबंधांवर बेतलेली कहाणी आहे. ती काहीशी गुंतागुंतीची, बहुआयामी आणि शेवटी हवीहवीशी वाटणारी अशी ही कथा आहे. प्रेम कमी होवू शकते पण नाती आयुष्यभराची असतात. काही माणसे अपघाताने भेटतात, पण मग आपलीशी होतात आणि तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. आपण जे आहोत, त्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो.
चित्रपटाबद्दल बोलताना राजवाडे म्हणाले, 'या चित्रपटामध्ये आपल्या प्रियजनांना एकत्र आणण्याची ताकद आहे. आपल्या आयुष्यात ज्यांचा अविभाज्य सहभाग होता त्यांची आठवण चित्रपट करून देतो. हा चित्रपट अशा व्यक्तींबद्दल आहे की, ज्यांनी आपल्या आयुष्याला वळण दिले आहे आणि एखाद्या ‘ऑटोग्राफ’ प्रमाणे आपल्या आयुष्यावर अनोखी अशी छाप पडली आहे. आपल्या प्रत्येकाची स्वतःची अशी एक प्रेमकथा असते आणि त्यातील काही या अव्यक्त असतात तर काही छुप्या असतात. मनाच्या कोपऱ्यात खोलवर त्यांना स्थान असते, आणि त्या आपल्या हृदयाच्या खूप जवळ असतात. ‘ऑटोग्राफ’ आपल्याला या सर्व प्रिय क्षणांची आठवण करून देईल. चित्रपटात आनंदाचे अनेक क्षण आणि दुःखाची झालर असलेल्या अनिवार्य अशा क्षणांची आठवण करून देतो. पण सरतेशेवटी, ही हृदयाला भिडणारी एक कथा असून आपल्यातील प्रत्येकजण ती आयुष्यभर जपून ठेवेल अशी आहे.'
'ही कथा एकमेवाद्वितीय अशी आहे. प्रेक्षकांच्या मनावर ती खोलवर अनोखा असा परिमाण कोरून ठेवेल,' असे उद्गार चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया यांनी काढले. ते पुढे म्हणतात, 'याचे बरेचसे श्रेय हे चित्रपटाचे प्रतिभावान दिग्दर्शक सतीश राजवाडे यांना जाते. कारण, त्यांनी सातत्याने दर्जेदार काम केले आहे. त्याशिवाय चित्रपटाची कथा दमदार आहे आणि यातील कलाकारांनी उत्तम असे काम केले आहे. त्यामुळे चित्रपट एका विशिष्ट उंचीवर गेला आहे. दर्जेदार निर्मितीसाठी जे करणे गरजेचे होते ते सर्व आम्ही केले आहे. आता चित्रपट प्रेक्षकांसमोर घेवून जाण्याची प्रतीक्षा करतो आहोत. ते आम्हाला भरपूर प्रतिसाद देतील असा पूर्ण विश्वास आहे.'
एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने यापूर्वी अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुंबई-पुणे-मुंबई, वेडिंगचा शिनेमा, बापजन्म, आम्ही दोघी, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाइमपास आदी चित्रपटांचा त्यात समावेश आहे.
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सतीश राजवाडे यांची ही सांगीतिक प्रेमकथा ३० डिसेंबर २०२२ रोजी राज्यभरात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झाली आहे.