मुंबई - यंदा नारळी पौर्णिमा आधी आल्याने रविवारपासून पुन्हा मासेमारीला सुरुवात होईल. पण त्यापूर्वी पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी सागराची विधिवत पूजा केली जाते. त्यात नारळ अर्पण केला जातो. अनेक वर्षांपासूनची कोळीवाड्याची ही परंपरा आहे. काळ बदलला तरी कोळी बांधवांनी ही परंपरा कायम ठेवली आहे.
यंदाचे मासेमारीचे सीझन सुरू होण्यापूर्वी आज बुधवारी नारळी पौर्णिमेनिमित्त वेसावा कोळीवाड्यात पारंपारिक पद्धतीने मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी थोरामोठ्यांपासून बच्चे कंपनीसह सर्वांनी पारंपरिक कोळी पेहराव परीधान करुन वाजत गाजत मिरवणुकीनत सहभागी झाले होते. वेसाव्यातील नऊ गल्ल्यांमधील प्रत्येक गल्लीची मिरवणूक एकत्र बंदरावर आली. मग मानाची पूजा करुन मावळत्या सूर्याला साक्षीला ठेवून समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला.