मुंबई - मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा कमी करण्यास परदेशी अपयशी ठरल्याने त्यांची बदली करण्यात आली असल्याची चर्चा आहे. परदेशी यांच्या जागी नगर विकास विभागात सचिव असलेल्या इकबाल चहल यांची पालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र, या बदलीवरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सरकारवर टीका केली आहे. आपली जबाबदारी झटकण्यासाठी आयुक्तांची बदली हा मार्ग नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्याऐवजी उपाययोजन सशक्त आणि गतिमान करण्याची गरज असल्याचे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.
![mumbai minicipal](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/7117651_aaaj.jpg)
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त म्हणून ठाणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त असलेल्या संजीव जैस्वाल यांची नेमणूक करण्यात आली आहे.
![mumbai minicipal](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/7117651_aaaa.jpg)
मुंबई मेट्रोच्या माजी संचालक अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या अतिरीक्त आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर माजी अतिरीक्त सचिव जयश्री बोस यांची बदली महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाच्या संचालक पदावर करण्यात आली आहे.
मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांची बदली सार्वजनिक बांधकाम विभागात मनोज सौनिक यांच्या ठिकाणी करण्यात आली आहे. तर मनोज सौनिक यांना वित्त विभागातील अतिरीक्त सचिवपदी पाठविण्यात आले आहे.
मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण 11 मार्चला आढळून आला होता. 7 मे पर्यंत दोन महिन्यांच्या कालावधीत कोरोना रुग्णांचा आकडा 11 हजार 219 वर तर मृतांचा आकडा 437 वर पोहोचला आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असलेल्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करत असलेल्या वरळी विभागात आढळून आले आहेत. धारावीतील रुग्णांचा आकडाही 800 पर्यंत पोहोचला आहे. गेल्या दोन महिन्यात मुंबईमधील कोरोनाचा आकडा काही केल्या कमी झालेला नाही.
एकीकडे मुंबईत कोरोनाचा आकडा कमी होत नसताना सरकारने महसूल वाढवा म्हणून दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, त्याचे योग्य नियोजन न केल्याने मुंबईत फिजिकल डिस्टनसिंग न पाळता लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या रांगांमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असल्याने दोन दिवसांनी मुंबईमधील दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.
![mumbai minicipal](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/7117651_aaa.jpg)
अश्विनी भिडे पालिकेत -
मुंबई मेट्रोसाठी आरेमधील झाडे तोडणाऱ्या मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी भिडे यांची राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर बदली करण्यात आली होती. कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यावर भिडे यांची पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या वॉर रूममध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर भिडेंची आता पालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आयएएस अधिकारी जयश्री भोज यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आयएएस अधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांच्या जागी ठाण्याचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.