मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतने ( Actress Kangana Ranaut ) दाखल केलेल्या अर्जावर मुंबई न्यायालयाने ( Mumbai Court ) निकाल राखून ठेवला आहे. अंधेरी दंडाधिकारी कोर्टातील सुनावणी दुसर्या कोर्टात हस्तांतरित करण्याच्या मागणीसाठी कंगनाने अर्ज केला होता. ज्येष्ठ पटकथा लेखक कवी जावेद अख्तर यांनी कंगनाने एका मुलाखतीमध्ये आपली बदनामी केल्याचा आरोप करणारी तक्रार याचिका दाखल केली होती. ( Javed Akhtar Defamation Case )
कंगनाने अख्तर यांच्या विरोधात धमकी आणि खंडणीचा आरोप करत तक्रार केलेली आहे. अंधेरी दंडाधिकारी कोर्टातील न्यायाधीश पक्षपाती करत असल्याचा आरोप करत कंगनाने दुसऱ्या कोर्टात दोन्ही याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
काय आहे प्रकरण -
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एका मुलाखतीत कंगनाने आपल्याविरोधात बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी केली', अशी तक्रार गीतकार जावेद अख्तर यांनी वकील जय भारद्वाज यांच्यामार्फत केली. याविषयी पोलिसांच्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, वारंवार नोटीस देऊनही कंगना न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे महानगर न्यायदंडाधिकारी आर. आर. खान यांनी कंगनाला अखेरची संधी देत पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश मागील सुनावणीत दिले होते. शिवाय कंगना पुन्हा गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा अख्तर यांना दिली होती.
काय म्हटले होते कंगनाने?
कंगनाने तिच्या आरोपात म्हटले होते, की जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला, की ऋतिक रोशन व त्याचे वडील ही मोठी माणसे असून जर तू त्यांची माफी मागितली नाही तर ती माणसे तुला सोडणार नाहीत. तुला तुरुंगात पाठवतील व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना तुझ्याशिवाय आणखी कोणी जबाबदार नसेल. त्यानंतर कदाचित तुझ्याकडे कुठला पर्यायसुद्धा उरणार नाही व तुला आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दात जावेद अख्तर यांनी मला धमकविण्याचा प्रयत्न केला होता. कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही तिच्या सोशल माध्यम अकाऊंटवर जावेद अख्तर यांच्या विरोधात अशाच प्रकारचे आरोप केले होते.