मुंबई - मुंबईसह राज्यात मान्सूनने दमदार सुरुवात केली. परंतु, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने तलावांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. मुंबईकरांच्या डोक्यावर यामुळे पाणी कपातीची टांगती तलवार आहे. मुंबई मनपाकडून तसा प्रस्ताव आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
10 दिवस पाणी मुंबईला पुरेल - जून महिना जवळपास कोरडा गेल्यानंतर राज्यासह मुंबईत मान्सूनने जोरदार हजेरी लावली. उन्हाचे चटके आणि वाढत्या उष्णतेमुळे लांबलेला पाऊस सुरु झाल्याने हायसे वाटले. मात्र, मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईत देखील अधून-मधून सरी बसरत आहेत. पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर नसल्याने मुंबईत पाणी समस्या निर्माण झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलांवात केवळ 1 लाख 873 दशलक्ष लीटर म्हणजेच 6. 97 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. केवळ 10 दिवस पाणी मुंबईला पुरेल, असा पालिकेच्या जलविभागाचे म्हणणे आहे.
मुंबईकरांची तहान भागवण्याचे नियोजन - मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी प्रतिदिन 3 हजार 850 दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. सात पाणलोट क्षेत्रातून हा पुरवठा होतो. जून महिन्यात पाऊस लांबल्याने बहुतांश पाणलोट क्षेत्रांनी तळ गाठला आहे. सध्या भातसा आणि अप्पर वैतरणा या राखीव धरणातून पाणी पुरवठा सुरु आहे. दररोज 150 दशलक्ष लीटर पाणी पुरवठा करण्यात येतो आहे. राखीव पाणी साठ्यावर मुंबईकरांची तहान भागवण्याचे नियोजन पालिकेच्या जल विभागाने केले आहे. विलंबाने दाखल झालेला मान्सून देखील हुलकावणी देत आहे. मुंबईकरांवर पाणी संकटाचे ढग यामुळे गडद झाले आहेत. मुंबई महापालिकेने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत पाणी कपातीचा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. येत्या 1 जुलैपासून कपात लागू केली जाण्याची शक्यता आहे. पालिकेने तसा प्रस्ताव आयुक्त तथा प्रशासकांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. जुलै महिन्याच्या पंधरवड्यात पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्यास पाणी कपात 25 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे.
सात तलावातील पाणीसाठा, टक्केवारी
उच्च वैतरणा ० ०
मध्य वैतरणा १८,४१५ ०९.५२
भातसा ६,३१४ ०.८८
मोडकसागर ३४,३४७ २६.६४
तानसा ३२,६५४ २२.५१
विहार ६,८३० २४.६६
तुळशी २,३१४ २८.७६