मुंबई - लॉकडाऊनमध्ये आलेल्या वाढीव वीजबिलावरून आधीच सर्वसामान्याचा जीव मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर वाढीव वीजबिलाबाबत फसवणुकीच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली आहे.
कोरोना टाळेबंदीच्या दिवसांमध्ये व्यापार उद्योग बंद होऊन असंख्य लोक बेरोजगार झालेले असताना आणि अनेकांच्या पगारात २५ ते ५० टक्के कपात झाल्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले असताना वीजबिलांची भरमसाठ रक्कम भरणे बहुसंख्य नागरिकांना शक्यच नव्हते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह इतरही राजकीय पक्षांनी नागरिकांमधील संतापाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे वीजविलांबाबतच्या तक्रारी मांडल्या.
नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन-
त्यानंतर ऊर्जामंत्री, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि वीज कंपन्यांचे प्रमुख अधिकारी यांच्यात अनेकदा बैठकाही झाल्या. प्रत्येक बैठकीनंतर 'वीजबिलात कपात करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेऊ आणि नागरिकांना दिलासा देऊ' असे आश्वासन उर्जामंत्र्यांनी दिले. ऊर्जामंत्री आपल्या शब्दाला जागतील आणि त्यांच्यामुळे वीजबिलात कपात होऊन करोना संकटकाळात थोडासा आर्थिक दिलासा मिळेल, या आशेवर राज्यातील नागरिक असताना ऊर्जामंत्र्यांनी अचानक घुमजाव केलं आणि 'प्रत्येक वीजग्राहकाला वीजबिल भरावेच लागेल' असं फर्मान काढलले. असे मनसेने आपल्या पत्रात म्हटले आहे.