मुंबई : रविवारी दुपारी राज्याच्या राजकारणात अत्यंत विलक्षण अशा घटना घडल्या. शिंदे सरकारमधील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या इतर आठ समर्थक आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. या आमदारांमध्ये छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे, अनिल पाटील आणि धर्मरावबाबा अत्राम यांचा समावेश आहे. या प्रत्येक आमदाराबद्दल थोडक्यात जाणून घ्या.

1) छगन भुजबळ : छगन भुजबळ यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. मात्र 1991 साली त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर 1999 मध्ये ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात शामिल झाले. 1999 मध्ये त्यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते एप्रिल 2002 ते डिसेंबर 2003 या कालावधीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. त्यानंतर 2008 मध्ये ते दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले. 2014 नंतर फडणवीस सरकारच्या काळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ज्यामुळे त्यांना जेलमध्येदेखील जावे लागले होते.

2) धनंजय मुंडे : धनंजय मुंडे 1995 च्या विधानसभा निवडणुकीपासून राजकारणात आले. ते आधी भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी आघाडीचे प्रमुख होते. 2019 विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर परळी मतदारसंघातून विजयी झाले. तेथे त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व दिग्गज भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा पराभव केला. सध्या ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते.

3) दिलीप वळसे-पाटील : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे-पाटील सहा वेळा आमदार राहिले आहेत. 1990 पासून ते सतत विधानसभेवर निवडून येत आहेत. ते पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे मोठे नेते असून तेथील राजकारणावर त्यांची चांगली पकड आहे.

4) हसन मुश्रीफ : हसन मुश्रीफ कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ते महाराष्ट्र सरकारमध्ये ग्रामीण विकास आणि कामगार मंत्री राहिले आहेत. ते पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.

5) अदिती तटकरे : अदिती तटकरे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. त्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्या 2019 मध्ये ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री झाल्या. तेथे त्यांनी उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय सांभाळले.

6) संजय बनसोडे : संजय बनसोडे यांनी 1992 मध्ये काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केली. 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2019 मध्ये ते उदगीर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी राज्य सरकारमध्ये पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम विभागांचे राज्य मंत्री पद सांभाळले आहे.

7) अनिल पाटील : अनिल पाटील जळगावच्या अमळनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ते जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत.

8) धर्मरावबाबा अत्राम : धर्मरावबाबा अत्राम गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
हेही वाचा :
- Maharashtra Political Crisis : ' ... म्हणून आम्ही एकत्र आलो, कोण क्लिन बोल्ड झाले हे सर्वांनी पाहिले'
- Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच दोन उपमुख्यमंत्री! अजित पवारांनी घेतली 3 वर्षांत तिसऱ्यांदा शपथ
- Maharashtra Political Crisis : 'केंद्रीय यंत्रणांची भिती दाखवून..', नाना पटोलेंचा भाजपवर मोठा आरोप