मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील दिवा रेल्वे स्थानकादरम्यान असलेले रेल्वे फाटक तब्बल पंधरा ते वीस मिनिटे खुले असल्याचे समोर आले आहे. यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवेला मोठा फटका बसला आहे. अनेक लोकल ट्रेन एकामागे एक खोळंबल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना लेट मार्क लागलेला आहे.
प्रवाशांना मनस्ताप -
रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे लोकल सेवा अगोदरच 15 मिनिट उशिराने धावत होत्या. त्यातच रविवारी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान दिवा रेल्वे स्थानकातील फाटक नियमित वेळेपेक्षा पंधरा ते वीस मिनिट जास्त वेळ खुले राहिल्याने लोकल गाड्यांची वाहतूक ठप्प होती. त्यामुळे एकामागे एक लोकल गाड्या उभे राहिलेल्याने लोकल सेवा खोळंबल्या होत्या. परिणामी रेल्वे स्थानकावर असलेली प्रवाशांची गर्दी सुद्धा वाढत होती. अखेर दुपारी 4 वाजताच्या सुमारास फाटकातील वाहनांची वाहतूक बंद झाल्यानंतर लोकांची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. यामुळे लोकल गाड्यांना लेटमार्क लागला. तसेच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलेला आहे.
हेही वाचा - उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परिक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने होणार
वक्तशीरपणा बिघडण्याचे हे कारण -
मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेच्या वक्तशीरपणा बिघडण्यामध्ये रेल्वे फाटक ही मोठी अडचण आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कळवा, दिवा आणि आंबिवली ही तीन रेल्वे फाटक आहेत. हे फाटक दिवसभरात अनेकदा उघड-बंद होतात. त्यामुळे लोकल लेटमार्क लागतो. ठराविक वेळेपेक्षा जास्त वेळ फाटक सुरूच राहिल्याने लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडते. तर फाटकातून जाताना वाहन मध्येच बंद पडते. फाटक ओलांडून जाताना होणारे अपघात या सर्व कारणांमुळे लोकल फेऱ्यांच्या वक्तशीरपणा बिगडत आहे.
तीन फाटकांबद्दल माहिती -
दिवा फाटक 15 मिनिटांनी उघडते. त्यामुळे दिवसभरात सरासरी 30 लोकल ट्रेन उशिराने धावतात.
कळवा फाटक 15 ते 20 मिनिटांनी उघडते. त्यामुळे दिवसभरात सरासरी 20 लोकल ट्रेन उशिराने धावतात.
आंबिवली फाटक 20 मिनिटांनी उघडते. त्यामुळे दिवसभरात सरासरी 10 लोकल ट्रेन उशिराने धावतात.