मुंबई - भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने आक्राळविक्राळ रुप धारण केले आहे. देशात दररोज 3 लाखांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळेच कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या औषधांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यात सर्वात आघाडीवर रेमडेसिवीर हे इंजेक्शन आहे. एकिकडे रेसमडेसिवीरची मागणी वाढत आहे, तर दुसरीकडे औषध विक्रेत्यांकडून नफेखोरीसाठी याचा काळाबाजारही होत आहे.
फार्मा कंपनीकडून रेमडेसिवीर इंजेक्शन 800 ते 1000 रुपयांना मिळतात. पण महाराष्ट्र सरकार हे इंजेक्शन जवळपास 1300 रुपयांना खरेदी करते तर मुंबई महानगरपालिका 1550 रुपयांना खरेदी करते त्यामुळे या इंजेक्शनच्या किमतीमध्ये तफावत आहे. राज्य सरकार आणि महानगरपालिके मधला त्या संदर्भात चौकशी केली जावी, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी केली आहे. रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या किमतीने आकाशाला गवसणी घातली आहे. म्हणूनच सर्वसामान्यांना हे औषध खरेदी करणे अशक्य झाले आहे. मात्र, तज्ज्ञांनी रेमडेसिवीर हे कोरोनावरील उपचारासाठी एकमेव प्रभावी औषध नसल्याचे सांगितले. पण या इंजेक्शनच्या किंमतीवरून सध्या गदारोळ पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिका सर्वात जास्त किमतीने हे रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करते तर सगळ्यात कमी दरामध्ये मिरा-भाईंदर महानगरपालिका अवघ्या 650 रुपयांमध्ये इंजेक्शन खरेदी करते. त्यामुळे एवढ्या महाग किमतीने मुंबई महानगरपालिका का इंजेक्शन खरेदी करते, या संदर्भात चौकशी व्हावी अशी मागणी किरीट सोमैया यांनी केली आहे.
कोरोनाच्या काळात ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार वाढला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमती महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या दरांमध्ये चढ्या भावाने विकला जात असल्याने या संदर्भात मोठा भ्रष्टाचार होत आहे आणि तो लवकरच उघडकीस येणार आहे त्यासंदर्भात आम्ही लोकायुक्त आणि अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे तक्रार केलेली आहे, अशी माहिती किरीट सोमैया यांनी दिली.
सकारात्मक! पंढरपूरमध्ये कोरोनाबाधित महिलेची प्रसुती; बाळ आणि माता दोघेही सुखरुप