मुंबई : मुंबई महानगरातील चर्नी रोड येथील रेल्वे स्टेशनजवळ शासकीय वस्तीगृह सावित्रीबाई फुले या ठिकाणी विद्यार्थिनीचा खून झाल्याची घटना घडली होती. ही विद्यार्थिनी एकटी खोलीत राहायची. त्या संदर्भात तिची सुरक्षा वाऱ्यावर सोडली गेली होती; असा आरोप झाला होता. 14 जूनपर्यंत त्यासाठी शासनाने नेमलेली समिती आपला अहवाल सादर करणार होती. हा अहवाल शासनाला सादर झाला आहे. त्यातील शिफारशीनुसार उच्च, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वसतिगृहाच्या अधीक्षिकेला अखेर निलंबित केलेले आहे.
प्रशासनावर प्रश्नचिन्ह : मृत विद्यार्थिनी तिचे पालक यांनी शासनावर बेजबाबदारपणाचा आरोप केलेला आहे. वसतिगृह प्रशासनाचा ज्या ओमप्रकाश याच्यावर संशय आहे; त्याला सुरक्षारक्षकाची नोकरी दिलीच कशी असा गंभीर प्रश्न केला आहे. हा आरोपी वसतिगृहात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत असे. तसेच तो त्याच्या आधी कपडे धुण्याचा काम देखील करायचा. त्यामुळे या संदर्भात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील शासनाला प्रश्न केला होता. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील महिलांच्या मुलींच्या सुरक्षेविषयी शासनाला सवाल केला होता. या सर्वाचा परिणाम म्हणून शासनाने नेमलेल्या समितीने वसतीगृहाच्या अधीक्षिकेला तात्काळ निलंबित करण्याची शिफारशीवर आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी निर्णय घेतला.
मुलीच्या कुटुंबाला मदत : यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. "शासनाने मृत विद्यार्थीनीच्या घटनेबाबत गांभीर्याने दखल घेतलेली आहे. त्यासाठी चौकशी समिती नेमली गेली होती. त्या समितीच्या प्राथमिक अहवालातील शिफारशीनुसार वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. तसेच मुलीचे कुटुंब खचून जाऊ नये. म्हणून त्यांना पाच लाख रुपयांचे आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. तसेच त्यांना अजून मदत व्हावी म्हणून मुलीच्या भावाला कंत्राटी पद्धतीने तात्पुरती नोकरीची संधी देखील उपलब्ध करून देण्यात येईल." असेही मंत्री पाटील यांनी नमूद केले.