मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक ठिकाणी रुग्णांना औषध मिळत नसल्याच्या, औषधांचा तुडवडा असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारीची दखल घेत अखेर मुंबईकरांसाठी औषध विक्रते पुढे आले आहेत. त्यानुसार मुंबईत 50 ठिकाणाहून घरपोच औषधे पुरवण्याचा निर्णय या औषध विक्रेत्यांनी घेतला आहे. फोर्टपासून पुढे विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड अशा विविध ठिकाणच्या दुकानामध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
हेही वाचा- धक्कदायक..! घशात चॉकलेट अडकल्याने गुदमरून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
रिटेल अॅड डिस्पेन्सिंग केमिस्ट असोसिएशनने हा उपक्रम हाती घेतला आहे. रुग्णांनी या 50 पैकी आपल्या जवळच्या औषध विक्रेत्याला फोन करत ई प्रिस्क्रिप्शन पाठवल्यानंतर त्यांना औषधे घरपोच नेऊन दिली जाणार आहेत. याची माहिती महाराष्ट्र स्टेट ड्रजिस्ट अॅड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली आहे. तर औषध मिळत नसल्याच्या, औषधांचा तुडवडा असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पुढचे तीन महिने पुरतील इतका औषधांचा साठा मुंबईसह महाराष्ट्रभर आहे. त्यामुळे रुग्णांनी चिंता करू नये, असे आवाहनही त्यानी केले आहे.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज नववा दिवस आहे.