मुंबई - गेल्या वर्षी 12 ऑक्टोबरमध्ये सकाळी मुंबईतील बहुतांश भागात अचानक वीज गेली होती. यामध्ये चीनचा हात असल्याचा दावा अमेरिकेतील 'न्यूयॉर्क टाईम्स'ने केला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. 'तो घातपातच होता', असे राऊत यांनी आज स्पष्ट केले. या संदर्भातील सायबर सेलचा अहवाल विधीमंडळात मांडला गेला.
मुंबई एसईसीएडीए युनिट आज त्यांना पुरवठा आणि मागणीनुसार लोड पाठविण्याला संतुलित करते काही यंत्रणेचे फायरवॉल तोडून चीन, युके आणि इतर ठिकाणांहून 8 ट्रोजन हॉर्स यंत्रणेमध्ये घुसले होते. त्यामुळे 8 जीबी डेटा चोरीला गेला त्यामुळे हा घातपात झाला होता, हे सायबर विभागाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या पुढे आमचा विभाग या संदर्भात अत्यंत काळजीपूर्वक काम करेल, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सायबर हल्ल्यामुळे संपूर्ण मुंबई काळोखात
भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये सीमेजवळ जोरदार संघर्ष सुरू असतानाच चीनने हा सायबर हल्ला केला होता. भारतामधील वीजपुरवठा सुरळीत चालवण्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरले जाते. ते हॅक करून चीनमधील हॅकर्सने त्यात मालवेअर व्हायरस टाकला होता. या मालवेअरचा शोध 'रेकॉर्डेड फ्युचर' या सायबर सिक्युरिटी कंपनीने घेतला आहे. रेकॉर्डेड फ्युचरचे कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट सोलेमॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सरकार पुरस्कृत रेडइको कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेमधील एक डझनहून अधिक ठिकाणी घुसखोरी केली. या सायबर हल्ल्यामुळे संपूर्ण मुंबई काळोखात गेली होती.