मुंबई- भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या 'राजगृह' यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भीमराव (दादासाहेब) आंबेडकर यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे,त्यांनी याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे.
मंगळवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'ची दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतके महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.या कालच्या घटनेनंतर देशभर निषेध व्यक्त होत आहे.
आरोपींना पकडून लवकर कारवाई करा, अशी मागणी सर्वजण करत आहेत. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेचा निषेध करत, तात्काळ आरोपींना अटक झाली पाहिजे, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.