मुंबई - विरोधकांना काय करायचे ते त्यांनी करावे, आम्हाला सरकार आणि सभागृह चालवायचे असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. चांगल्या व्यक्तीच्या संदर्भात जर एखादी चर्चा येणार असेल तर त्याबाबत कोणालाही आक्षेप घेण्याचे कारण नाही. ज्या व्यक्ती हयात नाहीत, अशा व्यक्तींबद्दल अनावश्यक विधाने करून गैरसमज पसरवण्याचे काही काम नाही. सावरकरांचे योगदान नाकारता येणार नसल्याचे अजित पवार म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव भाजपकडून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना सादर करण्यात आला. याबाबत कामकाज सुरू होण्यापूर्वी पवार उत्तर देत होते. विरोधकांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला सभागृह चालवायचे असल्याचे अजित पवार म्हणाले. सभागृहात काम होणे महत्त्वाचे आहे. काल विरोधक सभागृहात गोंधळ घालत होते, परंतू, आम्ही एक विधेयक मंजूर करून घेतले. विधेयक मंजूर होणंही महत्त्वाचं असते. सभागृह हे नियमाप्रमाणे चालते. कामकाज सल्लागार समिती असते. सभागृहाचे अध्यक्ष असतात. एखादा विषय घ्यायचा असेल तर ऐनवेळीही घेता येतो. सर्वजण ठरवतील त्याप्रमाणे सभागृहाचे कामकाज चालेल, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.