मुंबई - विधीमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन 7 व 8 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. आरटी-पीसीआर कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असल्याची खात्री केल्यानंतरच आमदारांना विधानभवनामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. आज यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली.
मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ सभागृहाच्या सदस्यांसाठी दिनांक 5 व 6 सप्टेंबरला सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत आरटी-पीसीआर कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या पूर्वतयारी संदर्भातील बैठकीला विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभागृह तसेच विधानभवन इमारत येथे सर्व खबरदारीच्या उपाययोजना कार्यान्वित करण्यासंदर्भात आज घेतलेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सोमवारी दिनांक 7 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनी कोरोना विषाणू संसर्ग नसल्याबाबत अधिकृत प्रयोगशाळेचा अहवाल विधीमंडळ सचिवालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. 25 ऑगस्टला झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे निश्चित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री, मंत्री परिषदेतील सर्व मंत्री, राज्यमंत्री, विरोधी पक्ष नेते आणि त्यांच्या सोबतचे स्वीय सहाय्यक यांना विधानभवन इमारतीत प्रवेश करण्यासाठी कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.