मुंबई - गोवा आणि कर्नाटकप्रमाणे राज्यातही काँग्रेसच्या आमदारांची फोडाफोडी करून सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे भाजपकडून रचले जात असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या सर्व 44 आमदारांना जयपूरला पाठवण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईतून एका खास विमानाने या आमदारांना जयपूरला पाठवले जाणार आहे. मागील दोन दिवसांपासून काँग्रेसच्या आमदारांना फोडण्यासाठी भाजपकडून साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर केला जात आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवले जात आहे, अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईत दिल्याने ही खबरदारी घेतली जाणार आहे.
हेही वाचा - राज्यपालांनी राज्याची सूत्रे हाती घ्यावीत- पृथ्वीराज चव्हाण
येत्या काही दिवसात काँग्रेसचे अनेक आमदार भाजपकडून फोडले जाण्याची भीती काँग्रेसच्या अनेक नेत्यांना वाटत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आज काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले आहे. एका बैठकीनंतर आपल्या आमदारांना जयपूर येथे एका खास विमानाने नेण्याची तयारी काँग्रेसकडून करण्यात आलीे असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.