मुंबई - काँग्रेसच्या वतीने देशात उद्भवलेल्या आर्थिक मंदी व महागाईच्या विरोधात आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सत्ताधारी पक्ष भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने गेल्या 5 वर्षात काय केले? हा प्रश्न विचारत देशात उद्भभवलेल्या मंदी व महागाई विरोधात गळ्यात भाजीपाला घालून कार्यकर्त्यांनी निषेध केला.
हेही वाचा - ऑईल टँकरमधील पेट्रोल चोरून पाणी भरणाऱ्या ३ आरोपींना पोलिसांनी केले गजाआड
भारताचा जीडीपी आज 5 टक्केवर येऊन पोहोचला आहे. देश भयंकर आर्थिक मंदीतून जात आहे. महागाई सर्व स्तरांवर वाढतच चालली आहे. पेट्रोल डिझेलचे दर दिवसाला वाढतच चाललेले आहेत. महागाईमुळे गरीबांना 2 वेळेचे अन्न नीट मिळत नाही. भाज्यांचे, धान्यांचे दर वाढलेले आहेत, असे असतानासुद्धा मुख्यमंत्री आगामी निवडणुकांच्या प्रचारामध्ये मशगुल आहेत. यात्रा काढत आहेत. त्यांना गरिबाला होणाऱ्या त्रासाचे काही पडलेले नाही, असा आरोप काँग्रस कार्यकर्त्यांनी केला.
हेही वाचा - 'चांद जमीन पर', मुंबईच्या रस्त्यांवर आरजे मलिष्काचं नवं गाणं एकदा पाहाच!
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी स्वतःहून या मंदीच्या वातावरणातून देशाला बाहेर काढण्यासाठी मदत करण्याची इच्छा दर्शवली होती. त्यांनी याअगोदर अर्थमंत्री असताना अशा परिस्थितून देशाला बाहेर काढले होते. पण त्यांच्या सल्ल्याला कोणी मान दिला नाही.
देशाची अर्थव्यवस्था लयाला चाललेली आहे. शिवसेना-भाजप सरकार गरिबांच्या संवेदनांच्या प्रति संवेदनशील नाही. म्हणूनच अशा असंवेदनशील सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला, असे माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस मुंबई अध्यक्ष गायकवाड, आमदार भाई जगताप, वर्षा गायकवाड, मुंबईतील काँग्रेस नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - शिवसेनेला अर्ध्या जागा मिळाल्या नाही तर युती तुटेल - खासदार संजय राऊत