मुंबई - अरबी समुद्रात अडकलेल्या 250 मच्छिमारांना वाचवण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आले आहे. अचानक बदलेल्या हवामानामुळे मच्छिमार समुद्रात अडकले होते. इंटरनॅशनल सेफ्टी नेट व नॅव्हटेक्स यांच्याशी समन्वय साधून हे बचावकार्य पार पाडण्यात आले. यामध्ये मर्चंट नेव्हीच्या जहाजांचा देखील सहभाग होता.

तामिळनाडुच्या फिशरीज् ऑथोरिटी, कोलाचेल यांनी मागितलेल्या मदतीला प्रत्युत्तर देताना संबंधित ऑपरेशन पार पाडण्यात आले. 50 मच्छिमाराच्या होड्या पश्चिम गोव्यापासून 250 नॉटीकल मैल अंतरावर समुद्रात अडकल्याची माहिती मिळाली. यानंतर मरीटाईम या तटरक्षक दल्याच्या केंद्रावरुन मदतकार्य हाती घेण्यात आले. या बचाव कार्यात 264 मच्छिमारांना वाचवण्यात यश आले.

03 डिसेंबरला मरीटाईम या तटरक्षक दलाच्या केंद्राला मदतीसाठी फोन आल्यानंतर त्या ठिकाणाहून वावरणाऱ्या व्यापारी जहाजांशी संपर्क साधण्यात आला; व भारतीय तटरक्षक दलाची जहाजे पोहोचेपर्यंत त्यांना तत्काळ मदत पोहचवण्याच्या सुचना देण्यात आल्याचे तटरक्षक दलाने सांगितले.

भारतीय व्यापारी जहाज 'नवधेनु पूर्णा'ने 86 मच्छिमार तर, जपानी जहाज 'एम व्ही तोवदा'ने 34 मच्छिमारांना वाचवले. यानंतर लवकरच भारतीय तटरक्षक दलाची पाच जहाचे दाखल झाली; व संयुक्त बचावकार्यात एकूण 264 मच्छिमारांना वाचवण्यात आले. या मच्छिमारांना तत्काळ खाद्य व वैद्यकीय मदत पुरवण्यात आल्याची माहिती तटरक्षक दलाने दिली.
भारतीय तटरक्षक दलाच्या समुद्र प्रहारी, समर, सावित्रीबाई फुले, अमल, अपूर्व यांमार्फत अद्याप बचावकार्य सुरू असून यामध्ये कोस्ट गार्डच्या डोरनिअर एअरक्राफ्टचा समावेश आहे.