मुंबई - धारावी येथे एक 40 वर्षीय व्यक्ती कोरोना 'पॉझिटिव्ह' आढळून आला होता. त्याची 16 एप्रिलला तपासणी झाली होती. मात्र, प्रशासनाने अहवाल देण्यास विलंब केला आणि मृत्यू नैसर्गिक झाल्याचे पालिका रुग्णालयाने सांगितले. परंतु, त्या रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे, असे कुटुंबीय व भाजपचे म्हणणे असून पालिका व राज्य शासनाच्या संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
धारावीतील 46 वर्षीय व्यक्तीने कोरोनाची लक्षणे जाणवल्यामुळे चाचणी करून घेतली. मात्र, त्याचे अहवाल पालिकेने लवकर दिले नाहीत. मंगळवारी पहाटे या व्यक्तीला सायन रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू नैसर्गिक मृत्यू आहे, असे पालिका रुग्णालयात नोंद झाली. परंतु, हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होता. त्यामुळे या व्यक्तीच्या मृत्यूबाबत पालिका प्रशासनावर कडक कारवाई व्हावी, तसेच मृताच्या कुटुंबीयांची देखील चाचणी व्हावी आणि प्रशासनाने त्यांना सुरक्षित ठेवावे, अशी मागणी भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमैय्या यांनी केली आहे.