मुंबई - येथील मालाड पिंपरीपाडा येथे सुरक्षा भिंत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला भिंत बांधणारा विकासक दोषी असल्याची तक्रार मृतांचे नातेवाईक मितेश गोठणकर यांनी दिली आहे. माझी बहिण आणि वहिनी या दुर्घटनेत मृत झाले आहेत. या दुर्घटनेत माझ्या पायाला दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत मालाड भागात काल रात्रीपासून मुसळधार पडत आहे. मालाडजवळी पिंपरीपाडा येथील शिवनेरी शाळेजवळील एक सुरक्षा भिंत पाऊस सुरू असताना अचानक कोसळली. या भिंतीच्या पलीकडे पालिकेचे अधिकारी राहतात. आधी ही भिंत दगडाची होती. दगडाची भिंत पडून दुर्घटना होईल म्हणून त्या ठिकाणी नवीन भिंत बांधण्यात आली. ही भिंत ३० ते ३५ फूट उंच बांधण्यात आली. मात्र, इतकी उंच भिंत बांधताना त्याची जाडी दोन फुटाची ठेवण्यात आली. भिंतीच्या पलिकडचे पाणी जाण्यासाठी लहान होल ठेवण्यात आले. त्यामुळे पाऊस जोरात असताना पाण्याचा निचरा होत नव्हता. भिंती पलिकडे पाणी साचून राहत होते. रात्री पाऊस जोरात असताना भिंती पलिकडे पाणी साचले. त्यावेळी काही आवाज येत होता. म्हणून आम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच भिंत घरावर कोसळली. आम्ही ढिगाऱ्याखाली अडकलो होतो. दोन तास आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही. दोन तासांनी आम्हाला माझ्या भावाने बाहेर काढून रुग्णालायत आणले. रुग्णालयात आणल्यावर माझी बहिण आणि वहिनी सोनाली आणि सिद्धी गोठणकर यांचा मृत्यू झाल्याचे गोठणकर यांनी सांगितले.
मनुरे कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
माझी मुलगी तिचा नवरा आणि मुली दुर्घटना घडल्या त्या ठिकाणी राहत होत्या. घरात सहा जण होते. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. दोन मुली ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. त्यांना बाहेर काढले प्रिया मनुरे ही एक मुलगी वाचली आहे. एक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकली आहे, अशी माहिती मृतांच्या कुटुंबियांनी दिली.