मुंबई - एसटी महामंडळाच्या लालपरीने सहा दिवसात राज्याच्या विविध भागातील तब्बल १ लाख ६ हजार २४ मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचवण्याचे काम केलेल. त्यासाठी एसटीच्या हजारो चालकांनी अहोरात्र मेहनत करून ७ हजार २७२ बसेसने ही सेवा दिली असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आहे. काम नसल्याने त्यांनी गावाचा रस्ता धरला आहे. यापैकी काहींनी पायी प्रवास करत गाव गाठले. त्यामुळे या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेतला. त्यानुसार ९ मेपासून एसटी बसने मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यात येत आहे. यामध्ये राज्य परिवहन विभागासोबत एसटीच्या कर्मचाऱ्यांचे खूप मोठे योगदान असल्याचे परब म्हणाले.
दरम्यान, कोरोनाच्या काळात राज्य शासनाच्या निर्देशानुसार २३ मार्चपासून अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या हजारो कामगारांसाठी एसटी महामंडळाकडून सेवा देण्यात येत आहे.