लातूर - राज्याच्या आणि देशाच्या राजधानीत सत्ता स्थापनेची खलबते होत असली तरी स्थानिक पातळीवरील नेत्यांना पिकांच्या नुकसान पाहणीचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळेच आज दिवस उजडताच माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि बीडचे माजी आमदार जयदत्त क्षीरसागर हे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले होते. त्यामुळे सत्ता स्थापनेची समीकरणे जुळविण्याबरोबर पक्ष संघटनेवरही भर दिला जात असल्याचे समोर आले आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अहमदपूर तालुक्यातील परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली होती. पंचनाम्याची औपचारिकचा न करता सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली होती. त्यानंतर आता औसा आणि चाकूर तालुक्यातील पिकांची पाहणी करण्यासाठी चंद्रकांत खैरे आणि जयदत्त क्षीरसागर हे दाखल झाले आहेत. राज्यातील सेनेचे निवडून आलेले आमदार दिल्लीत असले तरी माजी मंत्री आणि आमदार हे बांधावर असल्याचे पाहवयास मिळत आहेत. सकाळी 11 च्या दरम्यान या दोघांनी लातूर औसा रोडवरील पेठ शिवारात पिकांची पाहणी केली. शिवाय नुकसानीच्या तुलनेत जाहीर झालेली मदत ही तुटपुंजी असून सत्ता स्थापन होताच शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत दोन टप्प्यात देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी खैरे यांनी सांगितले. सरकार स्थापन होण्यास आता विलंब लागणार नाही. त्यामुळे रब्बीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.