लातूर- पाणीटंचाईचा सामना वन्यप्राण्यांनाही करावा लागत आहे. निलंगा तालुक्यातील कलांडी पाटीवर पाण्याच्या शोधात असलेल्या हरणाचा रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे.
दुष्काळाची दाहकता वाढत असून वनविभागाच्या परिसरातील पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची भटकंती सुरू झाली आहे. मंगळवारी सायंकाळी पाण्याच्या शोधात असलेल्या हरणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. बुधवारी सकाळपर्यंत त्याच अवस्थेत हरणाचा मृतदेह रस्त्यावर पडून होता.
जावेद मुजावर यांनी स्थानिक शेतकऱ्यांना बोलावून यासंबंधी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानुसार हरणाला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. तालुक्यातील केळगाव वनविभागाच्या हद्दीतील हरणांची संख्या अधिक असून पाण्याच्या शोधात त्यांची भटकंती सुरू असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.