लातूर - मांजरा नदीकाठी असलेल्या हरंगूळ (खु) गावच्या शिवाराची 'ग्रीन बेल्ट' म्हणून ओळख आहे. अनेक वर्षापासून या परिसरातील शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत नगदी पिके घेतात. मात्र, मागील ३ वर्षापासून या परिसरात कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हंगामी पिकेही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नसल्याचे चित्र आहे. या कारणाने सालगड्याचे पैसे आणि नातवंडांची लग्ने शेतकऱ्याला कर्ज काढून करण्याची वेळ आली आहे.
अशाच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याची समस्या जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी राजेंद्र खराडे यांनी.. पाहूयात ईटीव्ही भारतने घेतलेला विशेष आढावा....
हरंगूळ गावचे प्रभाकर पवार हे वयाच्या 20 व्या वर्षापासून काळ्या आईची सेवा करत आहेत. शेती व्यवसायाबाबतचे ते चालते-फिरते विद्यापीठ असून पंचक्रशतील शेतकरी पिकाबाबतचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्या बांधावर येतात. मात्र, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर पर्याय काढण्यात सल्ला देणारे पवारच असमर्थ ठरत आहेत. त्यांना 25 एकर जमीन आहे. या जमिनीत त्यांनी एकरी 100 टन ऊस काढले आहे.
आता वयाची पंचाहत्तरी ओलांडली असतानाही प्रभाकर पवार यांचे परिश्रम आणि पीकपद्धती यामुळे प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा अनेक कार्यक्रमामध्ये गौरवही झाला आहे. केवळ जमिनीच दर्जेदार असून उपयोग नाहीतर त्याला पाण्याची जोड असणे आवश्यक आहे. पाणीटंचाई लक्षात घेता पवार यांनी 105 फूट खोल विहिरीत आडवे 4 बोअर तसेच शेतालगत असलेल्या ओढ्याजवळ 2 बोअर घेतले. पाणी लागले मात्र तेही अत्यल्प. त्यामुळे त्यांची पाण्याअभावी आता शेती धोक्यात आली आहे.
भर उन्हाळ्यात 10 एकर जोपासला जाणारा ऊसाचे क्षेत्र आता उजाड माळरानाप्रमाणे दिसत आहे. एवढेच नाहीतर पाणीटंचाईमुळे त्यांनी जनावरेही विकली असून सध्या जनावरांची तहान भागवण्यासाठी त्यांना इतरांच्या शेतावर जावे लागत आहे. ज्या शेतीवर त्यांनी 5 एकर जमीन विकत घेतली तीच जमीन आता कर्ज फेडण्यासाठी विकण्याची नामुष्की आल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
त्यांची आपल्या असलेल्या 25 एकराचे क्षेत्र जोपासण्यासाठी 3 सालगडी ठेवलेले होते. मात्र, आता ही संख्या दोनवर आली असून त्याचा पगारही कर्ज काढून दिला आहे. सद्य स्थितीमध्ये त्यांच्यावर महाराष्ट्र बँकेचे 4 लाखाचे कर्ज असून ते फेडायचे कसे हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. सध्या खरीपपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, यंदाही पावसाचे प्रमाण कमी राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे पेरणी होती की नाही याची चिंता पवार यांना लागली आहे.
नातवाने शेती सोडून थाटला दुसरा व्यवसाय -
आजोबाचे वाढते वय पाहता अजित पवार या नातवानेही शिक्षण पूर्ण होताच शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली होती. नातवाचा आधार मिळाला तरी प्रभाकर पवार यांनी शेती व्यवसायाकडचे लक्ष सुतभरही कमी केले नाही. मात्र, सततची नापिकी आणि पदरी पडत असलेली निराशा पाहता अजित पवार याने गावातच इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान थाटले आहे.
मागील 50 वर्षापासून प्रभाकर पवार यांनी मातीशी नाळ जोडली गेली आहे. यामुळे सकाळचे 10 वाजले की पवारांची पाऊल आपोआप शेतीच्या दिशेने वळतात. दरम्यान, पवारांसारखे लाखो शेतकरी निसर्गाची साथ मिळण्याची अपेक्षेत आहेत. यंदा तरी वरुण राजा बरसणार का हे पाहावे लागेल.