लातूर - कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक संकटावर मात करत शेतकरी कुटुंबाला घेऊन परिस्थितीशी दोन हात करतो. मात्र, एकाच वेळी दोन्ही संकट ओढवत असल्याने बळीराजा हा हताश झाला आहे. शिवाय सरकारची मदतही तुटपुंजी, त्यामुळे मुख्य व्यवसाय असलेली शेती ही आता बेभरवशाची झाली आहे. त्यामुळे आता जगणेही मुश्कील झाले असल्याची भावना गातेगाव येथील शेतकऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
खरिपाच्या सुरूवातीला पावसाने पाठ फिरवल्याने सर्वच पिके अडचणीत होती. एवढेच नाही तर पिण्याच्या पाण्याचाही प्रश्नही नागरिकांसह जिल्हा प्रशासनाला पडला होता. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे जी पिके पाण्याविना करपू लागली होती, तीच पिके आज पाण्यात गेली. निसर्गाचा लहरीपणा आता थेट शेतकऱ्यांच्या जीवनावर परिणाम करत आहे.
हेही वाचा - कर्जबाजारीपणाला कंटाळून लातुरात शेतकऱ्याची आत्महत्या
हातातोंडाशी आलेले खरीपाचे पीक परतीच्या पावसाने हिसकावून घेतले आहे. शिवाय सर्व शेतामध्ये पाणी साठले असून आगामी रब्बी हंगामाची पेरणी होणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांच्या मनात साशंकता आहे. कष्ट करूनही मोबदला तर लांबच मात्र, उत्पादनातुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही अवघड झाले आहे. त्यामुळे शेती करावी की नाही, अशी मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.
हेही वाचा - पंचनामे करण्याऐवजी सरसकट मदत जाहीर करा, भाजप प्रदेश उपाध्यक्षांचा घरचा आहेर
सध्याची निसर्गाची ही अवकृपा शेतकऱ्यावर बेतली असली, तरी शासकीय मदतीची अपेक्षा कायम आहे. सध्या पंचनामे सुरू आहेत. तर मदतीची रक्कम किती आणि कधी पदरी पडणार याबाबतही शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे.