लातूर- निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपातील पिके पाण्यात असून मदतीबाबत राज्यसरकार उदासीन आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन अहमदपूर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार मदत करण्याची मागणी करण्यात आली.
जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, उडीद, तूर या मुख्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी १५ दिवस उलटूनही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडले नाही. एकीकडे कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यात पावसामुळे हातातोंडाशी आलेले खरिपाचे पीक नष्ट झाले आहे. सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक आहे. जिल्ह्यात ४ लाख ५९ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. अंतिम टप्प्यात अहमदपूर, जळकोट, उदगीर या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने अद्यापही पिके पाण्यातच आहेत. त्यामुळे, त्वरित पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपयांची मागणी करीत आज अहमदपूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपकडून अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
यावेळी, ओला दुष्काळ जाहीर करावा, सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, पीक विमा ऑफलाइनद्वारे भरणे, अशा मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. राज्य सरकारकडून झालेल्या नुकसानीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे, शेतकरी संभ्रमतेमध्ये आहे. प्रत्यक्ष बांधावरची परस्थिती लक्षात घेता मदत देण्याची मागणी आमदार रमेश कराड यांनी केली. शिवाय अहमदपूर येथील कोरोना योद्धा डॉक्टरांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. ग्रामीण तसेच शहरी भागात राबणाऱ्या १५ डॉक्टरांना सन्मानपत्र देण्यात आले.
हेही वाचा- पूर्ववैमनस्यातून गर्भवती महिलेस चौघांनी केली मारहाण; आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश