मुंबई - "इंडियाज गॉट लेटेंट" या शोमध्ये वादग्रस्त विधान केल्यानंतर पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया आणि कॉमेडियन समय रैनाच्या मागे पोलीस चौकशीचं शुक्लकाष्ट लागलं आहे. दोघेही पोलिसांसमोर हजर राहण्यास कचरत आहेत. त्यांच्यावर अटकेची तलवारही टांगती आहे. सध्या समय रैना अमेरिकेत त्याच्या शोजसाठी गेला आहे. त्याला जेव्हा पोलिसात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला तेव्हा त्यानंतर भारतात नसल्याचं कारण देत व्हर्च्युअल पद्धतीन जबाब नोंदवण्याची विनंती पोलिसांना केली. मात्र सायबर आणि माहिती सुरक्षा विभागीनं त्याची ही विनंती नाकारली असून त्याला १८ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत, असं एका अधिकाऱ्यानं सोमवारी सांगितले.
पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया आणि इतरांविरुद्ध समय रैनाच्या वेब शो "इंडियाज गॉट लेटेंट"मध्ये पालक आणि लैंगिकतेबद्दल बेजबाबदार विधान केलं होतं. त्यानंतर एजन्सी पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याची चौकशी करत आहे.
पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, "समय रैना त्याच्या शोसाठी अमेरिकेत आहे. त्यानं महाराष्ट्र सायबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याचे म्हणणे नोंदवण्याची विनंती केली होती, परंतु एजन्सीने त्याची विनंती नाकारली आहे. त्याला१८ फेब्रुवारी रोजी एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे."
यापूर्वी, मुंबई पोलिसांनीही समय रैनाला १७ फेब्रुवारीपूर्वी चौकशीसाठी खार पोलिसांकडे हजर राहण्यास सांगितलं होतं आणि त्यानं परदेशातील त्याच्या शोबद्दलची माहिती दिली होती. पोलिसांनी यापूर्वी रणवीर अलाहबादियाच्या निवासस्थानी जबाब नोंदवण्याची विनंतीही नाकारली होती आणि त्याला स्वतः पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं.
मुंबई आणि आसाम पोलीस आणि महाराष्ट्र सायबर गुन्हा शाखेनं अद्याप रणवीर अलाहबादियाचा जबाब नोंदवलेला नाही. महाराष्ट्र सायबरनं या प्रकरणासंदर्भात किमान ५० जणांना त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावलं आहे. त्यामध्ये इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये सहभागी झालेल्यांचाही समावेश आहे.
अधिकाऱ्यानं सांगितलं की, ''शोबाबत त्यांच्याकडे दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेले आसाम पोलिसांचं एक पथक रविवारी आरोपींना त्यांच्या निवासस्थानी नोटीस बजावल्यानंतर परत रवाना झाले.'' अधिकारी पुढं म्हणाले की, ''आसाम पोलिसांनी सर्व आरोपींना गुवाहाटी येथे त्यांच्यासमोर प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले आहे.''
अनेक आरोपी त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी मुंबईत उपलब्ध नव्हते, त्यानंतर आसाम पोलिसांच्या पथकान त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) च्या कलम ३५ (३) अंतर्गत नोटीस बजावल्या, असं पोलीस अधिकारी म्हणाले. ते जर गुवाहाटी येथे पोलिसांसमोर हजर झाले नाहीत तर या प्रकरणात पुढील कारवाईसाठी पथक पुन्हा मुंबईला पोहोचू शकतं.
हेही वाचा -