कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यात भाजीपाल्यांवर औषध फवारणी तसेच पंचगंगा नदी प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात ( Cancer Due To Panchganga River Water ) कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र, याबाबत सर्व्हे ( Shirol Cancer Survey ) केला असता, असे काही नसून जिल्ह्यात इतर तालुक्यांसारखेच शिरोळमध्ये रुग्ण असल्याची माहिती आता डॉक्टरांनी दिली आहे. येथील जिल्हा परिषद कोल्हापूर, टाटा हॉस्पिटल आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या माध्यमातून सर्व्हे केल्यानंतर ही माहिती समोर आल्याचे डॉ. यांनी म्हटले आहे.
शिरोळबाबत नेमकी काय माहिती समोर आली होती? -
कोल्हापूरातल्या शिरोळ तालुक्यात शेतकरी ऊस आणि पारंपरिक शेतीसोबतच मोठ्या प्रमाणात फळ तसेच भाजीपाल्याचे उत्पादन घेत आले आहेत. मात्र, इथली जमीन जशी क्षारपड होत गेली. शिरोळ बाबत विविध माहिती समोर येत गेल्या. यामध्ये सर्वात धक्कादायक माहिती म्हणजे एकट्या शिरोळ तालुक्यातील जवळपास 25 ते 28 हजार कॅन्सरचे रुग्ण आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढण्याचे कारण इथले शेतकरी कीटकनाशकांचा अतिवापर करतात शिवाय पंचगंगा नदी प्रदूषणाचा सुद्धा कारण आहे, अशी चुकीची माहिती सर्वत्र पसरली. म्हणूनच याबाबत सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यामुळे अशा पद्धतीने कीटकनाशकांच्या अतिवापराने कॅन्सर होतो, ही माहिती चुकीची असून असे कुठेही स्पष्ट झाले नसल्याचे कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. सुरज पवार यांनी म्हटले. शिवाय झालेल्या सर्व्हेक्षणात अशी कोणतीही माहिती समोर आली नसून शिरोळ तालुक्यात एवढे रुग्ण आढळून आले नसल्याचेही त्यांनी म्हटले. ही केवळ चुकीची माहिती पसरविण्यात आली असून इतर तालुक्यात जेवढी संख्या आहेत, तशीच शिरोळ तालुक्यात सुद्धा कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या असल्याचे त्यांनी म्हटले.
कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून सर्व्हेक्षण -
याबाबत माहिती देताना डॉ. सुरज पवार म्हणाले, शिरोळमध्ये सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण आहेत, अशी माहिती जेंव्हा पसरली तेंव्हा इथल्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले. त्यामुळे खरंच इतके रुग्ण आहेत का आणि असतील तर त्याची काय कारणे आहेत, याबाबत शेवटी सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार जिल्हा परिषदेने टाटा हॉस्पिटल आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून 'कॅन्सर रुग्ण शोध मोहीम' घेतली. त्यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णच नाहीत, ही माहिती समोर आली. शिवाय जे रुग्ण आहेत, त्याची कारणे सुद्धा वेगवेगळी आढळली. इतर तालुक्यांचा अभ्यास केला असता, त्या ठिकाणी सुद्धा असेच रुग्णांचे प्रमाण आढळले. जिल्ह्यातील हजारो घरांमध्ये प्रत्यक्ष जाऊन सर्व्हेक्षण करण्यात आले त्यामध्ये शिरोळ तालुका तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले, तर हातकणंगले तालुका पहिल्या स्थानावर असल्याचे समजले. मात्र, जी 25 हजारांहून अधिक रुग्ण आहेत, ही संख्या अतिशय चुकीची आणि प्रचंड आहे आहे, असेही डॉ. पवार यांनी म्हटले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने याबाबतचे काही लक्षणे आढळताच आपली तपासणी करावी, असेही ते म्हणाले.
'ही' काळजी घ्या -
दरम्यान, सर्व्हेक्षणमधून अचूक माहिती तर समोर आलीच. मात्र, यापुढेही नागरिकांनी कॅन्सरबाबतची तपासणी वेळेवर करणे गरजेचे असल्याचे डॉ. सुरज पवार यांनी म्हटले. शिवाय कोणत्याही पद्धतीने लक्षणे आढळली तर तत्काळ जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याबाबतच्या उपचाराला सुरुवात करा. कॅन्सरचे वेळेत निदान झाल्यास तो पुर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे जितक्या लवकर कॅन्सरचे निदान होईल, तेवढे उपचारासाठी चांगले आहे, असेही ते म्हणाले. कॅन्सर हा तंबाखू, गुटख्याच्या सेवनामुळे होतो. हे तर जगजाहीर आहे. नागरिकांना त्याची माहिती आहेच. मात्र, याव्यतिरिक्त सुद्धा अनेक गोष्टी कॅन्सरचे कारण बनू शकतात, असेही डॉ. पवार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, हल्ली पाश्चात्य पद्धतीचा अवलंब सुरू आहे, जो नियमित आहार आहे, तो विसरून जंग फूडच्या मागे लागलो आहे. हे सर्वात पहिला थांबवले पाहिजे. योग्य आहार घेणे सर्वात महत्वाचे आहे. शिवाय कोणत्याही गोष्टीचा तणाव आणि जास्त विचार करणे सुद्धा कॅन्सरचे कारण बनू शकते, असेही पवार यांनी म्हटले.
हेही वाचा - Hijab Ban : 'पुढील निकाल येईपर्यंत हिजाबाचा आग्रह नको', सोमवारी होणार सुनावणी, न्यायालयाचे निर्देश