कोल्हापूर - "सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणविरोधी निकाल दिला आणि त्यानंतर समाजात प्रचंड खदखद निर्माण झाली. त्यादिवशीपासून मी समाजाला एका विधायक दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाहीत आंदोलने झाली पाहिजेत. आंदोलने मोर्चे काढणे प्रत्येक नागरिकाचा किंवा समाजाचा अधिकार आहे. आज समाज नाराज आहे, म्हणून त्यांच्या भावनांशी खेळ करणे मला मंजूर नाही. त्यांना वास्तव परिस्थितीची जाणीव करून देणे माझी जबाबदारी आहे", असे म्हणत राज्यभर मूक आंदोलन करणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली. येत्या 16 जून रोजी कोल्हापूरातील राजर्षी शाहू समाधीस्थळावरून या मूक आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, समाज बोलला, आम्ही बोललो आता तुम्ही बोला आणि जबाबदारी निश्चित करा, असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे.
केंद्र आणि राज्य दोघांचीही जबाबदारी -
यावेळी संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजाने जी ताकत दाखवायची होती ती दाखवली आहे. पुन्हा समाजाला रस्त्यावर उतरवून वेठीस धरणे योग्य होणार नाही. ज्या लोकप्रतिनिधींना समाजाने मते देऊन निवडून दिले. आता खरी जबाबदारी त्यांची आहे. त्या लोकप्रतिनिधींनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा आरक्षण कसे मिळवून देणार? हे सांगणे महत्वाचे आहे. समाजाला राजकीय पक्षांच्या वाद विवादात पडायचे नाही आहे. आजही लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणी म्हणत आहे की, आरक्षणाची जबाबदारी केंद्राची आहे. तर कोणी म्हणतात राज्याची. मात्र ही जबाबदारी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांची आहे असल्याचे संभाजीराजे म्हटले.
नेते बोलणार, समाज ऐकणार -
आंदोलनाची दिशा कशी असेल याबाबत बोलताना संभाजीराजे म्हणाले, मूक आंदोलनावेळी आमदार, खासदार आणि त्या जिल्ह्यातील पालकमंत्री सर्वांना सकल मराठा समाजाच्यावतीने आमंत्रित करण्यात येईल. त्यांना आंदोलनस्थळी बसण्याची व्यवस्था केली जाईल. एका बाजूला मी, महाराष्ट्रातील सर्व समन्वयक, समाजासाठी काम करणारे लोक आणि आमच्या समोरच्या बाजूला लोकप्रतिनिधी अशी ती बैठक व्यवस्था असेल. त्याठिकाणी आम्ही कुणीच बोलणार नाही. तर त्याजागी लोकप्रतिनिधींनी येऊन स्वतःची भूमिका जाहीर करावी. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी स्वतःची जबाबदारी निश्चित करावी, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, समाज बोलला, आम्ही बोललो आता तुम्ही बोला आणि जबाबदारी निश्चित करा! कारण ही वादळापूर्वीची शांतता आहे. ही एक टॅगलाईन सुद्धा बनविण्यात आली आहे. संभाजीराजे पुढे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आम्ही हे मूक आंदोलन करणार आहोत. समाज शांत असेल म्हणजेच मूकपणे ऐकणार. आणि आमदार, खासदार, मंत्री फक्त बोलणार. मराठा समाजाच्या मागण्या बाबत आमदार, खासदार, मंत्री यांनी समाजाच्या समोर, समाजाच्या साक्षीने बोलले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ही वादळापूर्वीची शांतता -
यावेळी संभाजीराजे म्हणाले, ही वादळापूर्वीची शांतता आहे. कुणीही समाजाला गृहीत धरू नये. आम्ही जिल्हा जिल्ह्यात केवळ बैठका चर्चा करतो असे नाही. तर त्याचदिवशी पुढील 'लाँग मार्च'ची तयारी सुद्धा करणार आहोत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात लाँग मार्चच्या तयारीसाठी सुद्धा बैठका घेणार आहोत. लाँग मार्च हा सरकारला परवडणारा नसेल. हा लाँग मार्च मुंबई विधानभवनावर चालून जाईल. मग बघतो कोण अडवत ते. पुणे, लाल महाल, येथून मी चालण्यास सुरुवात करेन. थेट मुंबईमध्ये विधान भवन वर त्याची सांगता होईल, अशीही घोषणा त्यांनी आज केली. तत्पूर्वी येत्या 12 तारखेला दुपारी कोपर्डी येथे भेट देणार आहे. पुणे येथून सर्व समन्वयक, माझ्यासोबत तिकडे येणार आहेत. तिथून पुढे काकासाहेब शिंदे यांच्या स्मृती स्थळास भेट देणार आहे. तिकडे जाताना सुद्धा सर्वजण आमच्यासोबत असतील, अशी माहिती त्यांनी दिली.