कोल्हापूर - शेतकऱ्यांना केंद्राने मदत करावी, असे म्हणत राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. पण, शेजाऱ्याच्या खाटल्यावर जाऊन संसार करता येत नसतो, बाळंतपण करता येत नाही, अशा शेलक्या शब्दात आज माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून, शेतकऱ्यांना तातडीने २५ हजारांची मदत जाहीर करावी, अशी मागणी केली. गडहिंग्लज तालुक्यात तारेवाडी येथे जाऊन रयत क्रांती संघटनेच्या वतीने शेतात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
बळीराजाला तातडीने मदत करा, अशी मागणी राज्यभरातील नुकसानग्रस्त शेतकरी करत आहे. विरोधी पक्षदेखील या मुद्यावरून आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. रयत क्रांती संघटनेकडूनदेखील आज राज्यभर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात तारेवाडी येथे हे आंदोलन करण्यात आले. तारेवाडीमध्ये तर ढगफुटीसदृश पाऊस पडून भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याचा आढावा घेऊन नुकसानग्रस्त शेतकरी आणि रयतक्राती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी पाहणी केली.
हेही वाचा - कोल्हापूर अन् इथली कोहळा पंचमी.. यंदाही उत्साहात सोहळा साजरा
पुढे खोत म्हणाले, पावसामुळे शेतीची मोठे नुकसान झाले आहे. गतसाली महापुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, त्यांना प्रतिहेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करून, तातडीची २५ हजारांची मदत घ्यावी, अशी मागणी केली. तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली. शेतकऱ्यांना आधार देण्याची भूमिका राज्य सरकारने घ्यावी. त्यांचे वीजबिल माफ करून दिलासा देण्याचे गरज आहे. कोरोनाचे कारण न देता मदत जाहीर करावी, अशी मागणी केली.