कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, नागरिक कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करत असल्याचे समोर आले आहे. राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे गावामध्ये हजारो गावकऱ्यांनी एकत्र पालखी उत्सव साजरा केला. जिल्हा प्रशासनाकडून बंदी असतानाही डीजे लावून पालखी उत्सव साजरा झाला. याचे काही व्हिडिओ समोर आले असून त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा कशा पद्धतीने फज्जा उडाला आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोल्हापुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली -
राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. कोल्हापुरात सुद्धा रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील दोन दिवसात 100 पेक्षा जास्त रुग्ण कोल्हापुरात आढळले आहेत. कोरोना रुग्ण संख्येत वाढ होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून राज्यभरातील सर्वच समारंभांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, बंदी झुगारून कसबा तारळे गावातील नागरिकांनी पालखी उत्सव साजरा केला.
महाराष्ट्रात 126 दिवसांनंतर कोरोना रुग्णांची संख्या 8 हजारपार
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण विक्रमी संख्येने वाढत आहेत. बुधवारी एका दिवसात आठ हजार रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला गेला आहे. १२६ दिवसांनंतर राज्यात आठ हजारांपेक्षा जास्त रुग्ण समोर आले आहेत. बुधवारी ८८०७ संक्रमित रुग्ण सापडले. याआधी २१ ऑक्टोबर रोजी ८१४२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते.