कोल्हापूर - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी 1 फेब्रुवारी रोजी देशाचे आर्थिक बजेट जाहीर करणार आहेत. तत्पूर्वी भाजपचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष तसेच शाहू सहकारी साखर करण्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनीसुद्धा या बजेटमधून आपली अपेक्षा व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांपासून कारखानदार अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. त्यामुळे अनेकवेळा शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणेसुद्धा शक्य होत नाही. याबाबतच घाटगे यांनी बजेटमधून साखर किमान विक्रीदरात वाढ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सध्या देशात गरजेपेक्षा जादा साखर निर्मिती होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात साखरेचा साठा होत असून कारखानदारांना शेतकऱ्यांचे पैसे देणे सुद्धा कठीण बनले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला कारखानदारांनी प्राधान्य द्यायचे आवाहन केले असून तसे प्रकल्पसुद्धा कारखान्यांमध्ये उभे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शिवाय कर्जपुरवठा सुद्धा करण्यात येत आहे. एवढेच नाही तर थेट उसाच्या रसापासून इथेनॉलनिर्मिती केल्यास 62 ते 65 रुपयांपर्यंत त्याला दर मिळतो. तर, पेट्रोलियम कंपन्यांकडून तत्काळ बिलसुद्धा अदा होते. त्यामुळे केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीबाबत घेतलेल्या या सर्व क्रांतिकारी निर्णयाबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन सुद्धा करत असल्याचे शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी म्हटले.
हेही वाचा - शहापूरच्या बेलवड परिसरात बिबट्याची दहशत; शेतकऱ्याची गाय केली फस्त