जालना - शहरातील हिंदी विद्यालयात इयत्ता पाचवीचे धडे घेताना 'त्याने' गणेश मूर्ती बनवण्याचा धडा गिरवला. त्यावेळी याच क्षेत्रात भविष्य घडवण्याचे ठरवले आणि तो कामाला देखील लागला. आज त्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. यंदा तो तब्बल अडीच हजार मूर्ती विकणार आहे. तसेच लवकरच गणेश मूर्तींचा कारखाना उभारणार आहे.
उमेश अशोक कापसे, असे या २० वर्षीय मूर्तीकाराचे नाव आहे. तो शहरातील कुंभारवाडा भागात राहतो. त्याने आपले ध्येय गाठण्यासाठी 2007 नंतर शाळा सोडली. त्यानंतर चांगल्या मूर्ती कशा तयार करायच्या यासाठी अनेक ठिकाणी मूर्ती तयार करण्याचे मार्गदर्शन घेतले. त्यामधून घरीच मातीपासून मूर्ती तयार करण्याचे काम सुरू केले. मात्र, त्यामध्ये रेखीवपणा येत नव्हता. त्यामुळे मधुकर गायकवाड आणि रामदास कुलकर्णी या दोन शिक्षकांनी त्याला आर्थिक बाजूसह व्यवसाय मिळवून देण्यासाठी मदत केली. या मदतीच्या जोरावर तो आता गणपती तयार करण्याचा कारखाना सुरू करणार आहे. त्यासाठी त्याने घरातील सर्वांनाच कामे विभागून दिली आहेत. त्याचा मोठा भाऊ लखन हा तयार केलेल्या गणेश मूर्तीवर कोरीव काम करतो. त्याची बहीण संजना ही गणपतीला टिळा आणि डोळे काढण्याचे काम करते. त्याचे वडील अशोकराव हे शाडू माती मळण्याचे काम करतात. वहिनी अंजना ही गणपतीच्या पाट्याला रंग देण्याचे काम करते. आई सीताबाई या गणपतीला पांढरा रंग देण्यासह उर्वरित कामे करण्यात त्याला मदत करतात.
उमेशने गेल्यावर्षी 2 हजार गणपती विकल्यानंतर यंदा अडीच हजार गणपती विकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून होणाऱ्या दुष्परिणाम होतात. त्यामुळे तो सर्व गणपती शाडूच्या मातीने तयार करतो. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विरघळण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागतो. मात्र, शाडूच्या गणेशमूर्ती फक्त अर्ध्या तासातच विरघळतात. त्यामुळे तो पर्यावरणाला पूरक अशा मूर्ती तयार करतो. यावर्षीच्या गणपतीमध्ये गणेश मंडळांनी सुचवलेल्या संकल्पनेनुसार हेल्थ क्लबसाठी बिल्डर गणपती, तालीम संघासाठी बजरंग बली गणपती, तर चोरून मोदक खाणाऱ्या उंदिराची तक्रार करतानाची मूर्ती अशा विविध संकल्पना मांडून २ ते ३ फुटांपर्यंत गणपती तयार करण्यात आले आहेत.
'अशी' तयार करतात गणेश मूर्ती -
अहमदनगर जिल्ह्यातून ४० किलो शाडू मातीची एक गोणी ५०० रुपयाला विकत घेतली जाते. त्यानंतर ही माती भिजून मळली जाते. साच्यामध्ये टाकून लहान गणेश मूर्ती तयार केली जाते. एक गणेश मूर्ती साधारण १० मिनिटात तयार होतो. त्यानंतर मूर्ती सात ते आठ दिवस वाळवण्यासाठी ठेवली जाते. त्यानंतर मूर्तीला रंगरंगोटी करून तिला आकर्षक रूप दिले जाते. मोठ्या मूर्तींसाठी साचा वापरता येत नाही. त्यामुळे त्या सर्व हातानेच तयार करावे लागतात. त्यासाठी बराचसा वेळ खर्च होतो. मात्र, यामधून मिळालेल्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. यामुळेच उमेशने आता याच क्षेत्रात भविष्य घडविण्याचे ठरविले आहे.