जालना - शहरात दहा वर्षांपूर्वी सुरू झालेले ट्रॅफिक सिग्नल वर्षभरातच बंद पडले. अरुंद रस्ते, त्यावर असलेली अतिक्रमणे आणि बंद पडलेल्या सिग्नलची नादुरुस्ती, या सर्व कारणांमुळे ते बंद पडले होते. मात्र, आता हा विषय पुन्हा ऐरणीवर आल्यामुळे नवीन जालना आणि जुना जालना या भागाला जोडणाऱ्या सुभाषचंद्र बोस चौकात हे सिग्नल तीन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले. जालनेकरांना सिग्नलची सवय व्हावी या हेतूने या चौकात प्रायोगिक तत्त्वावर सिग्नल सुरू करण्यात आले आहेत. सिग्नलची सवय नसल्यामुळे आजही वाहनचालक त्यांच्या सवयीनुसार वाहने चालवत आहेत. मात्र, त्यांना शिस्त लावण्यासाठी पोलीस मुख्यालयात नवीनच भरती झालेले दहा पोलीस कर्मचारी येथे तैनात करण्यात आले आहेत. अद्यापपर्यंत कुणालाही दंड करण्यात आला नाही. मात्र, समजावून सांगितले जात आहे.
हेही वाचा- कुस्तीपटू बजरंग पूनिया यांना केंद्रीय क्रीडामंत्र्यांकडून खेल रत्न पुरस्कार प्रदान
पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाला नगरपालिकेचे सहकार्य अजून मिळालेले नाही. तुटलेले नाले आणि रस्त्याच्या बाजूला असलेली अतिक्रमणे सिग्नलला अडथळा ठरू शकतात. त्यामुळे नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे सिग्नलचा हा प्रकल्प पुन्हा बारगळतो की काय? असा प्रश्नही ही उपस्थित केला जात आहे. त्याच सोबत रस्त्यावर फिरणारे मोकाट जनावरे ही देखील शहर वाहतूक शाखेला एक डोकेदुखी होऊन बसली आहे. गायीकडे भावनिकतिने पाहिले जाते. त्यामुळे या गाईंचे मालक दूध काढल्यानंतर या जनावरांना मोकाट सोडून देतात. ही जनावरे रस्त्याच्या मधोमध बसून रहदारीला अडथळा निर्माण करतात. यासंदर्भात औरंगाबाद पोलीस परिक्षेत्राचे महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी शहर वाहतूक शाखेला ताकीद देऊन ह्या जनावरांचा बंदोबस्त करण्याचे सांगितले आहे.
त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात या जनावरांच्या मालकावर देखील गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, नगरपालिकेकडे कोंडवाडाच नसल्याने ही जनावरे ठेवायची कुठे? हा प्रश्न असल्यामुळे शहर वाहतूक शाखा देखील याकडे दुर्लक्ष करीत आहे. पोलिसांच्या या उपक्रमाला नागरिकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे. शहरात मुख्य चौकांमध्ये हे असे सिग्नल बसवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.