जालना- शहर नगरपालिकेची ५ मार्च रोजी मागील सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेच्या वेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र, आचारसंहिता लागली आणि लोकसभेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालन्यात आले. त्यांच्या सभेत राऊत यांनी राष्ट्रवादी मधून भाजप मध्ये उडी मारली. त्यामुळे पूर्वी नगरपरिषदेच्या बाजूने बोलणारे राजेश राऊत काल (शनिवारी) विरोधी पक्षाप्रमाणे पालिका आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात बोलताना दिसून आले आहे.
मागील सर्वसाधारण सभेपर्यंत अध्यक्षा सौ. संगीता गोरंट्याल आणि राष्ट्रवादीचे त्तकालीन उपनगराध्यक्ष राजेश राऊत हे दोघेही नगरसेवकांच्या प्रश्नांना खंबीरपणे सामोरे जात होते. यावेळी दोघेही एकदुसऱ्याला संभाळून घेत होते. मात्र, राऊत यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याने त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका घेतली आहे.
भाजपात गेल्यानंतर राऊत यांनी नगरपरिषदेच्या कामकाजाबद्दल आतापर्यंत वारंवार मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. एवढेच नव्हे, तर आज सर्वसाधारण सभेच्या वेळी नगराध्यक्ष सौ. संगीता गोरंट्याल आणि उपनगराध्यक्ष राजेश राऊत हे शेजारी बसलेले असताना देखील एक दुसऱ्याला बोलले नाहीत. उलट शहरातील पथदिव्यांच्या बाबतीत उपनगराध्यक्ष राऊत यांनीच मुख्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. प्रत्यक्षात हा विरोध मुख्याधिकाऱ्यांना नव्हता, तर काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेतील नगराध्यक्ष, सौ. गोरंट्याल यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न होता.
त्याचसोबत नळपट्टीविषयी देखील राऊत यांनी पालिकेची बाजू न घेता "जर आपण जनतेला पाणी देऊ शकत नसू ,सुविधा पोहोचू शकत नसू तर कर मागायचा कशाला? असा प्रश्न करून पालिकेच्या उत्पन्नापेक्षा आपण जनतेच्या बाजूने आहोत आणि सत्ताधारी हे जनतेच्या विरोधात आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता नगरपालिकेत उपनगराध्यक्ष राजेश राऊत हे पालिकेच्या बाजूपेक्षा विरोधकांची भूमिका पार पाडत असल्याचे चिन्ह दिसत आहेत. या प्रकारामुळे माजी आमदार कैलास गोरंट्याल तसेच त्यांची पत्नी नगराध्यक्षा सौ. संगीता गोरंट्याल यांच्या अडचणीमध्ये भर पडणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.