जालना - गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील एका व्यावसायिकाला 2 कोटींच्या खंडणीसाठी अज्ञात पाच ते सहा जणांनी साठेवाडी फाटा येथून अपहरण (Trader Kidnapping for ransom) केले. त्यानंतर तोंडात बोळा व हातपाय बांधून मारहाण करत सदरील व्यक्तीस वडीगोद्रीजवळ (Vadigondri) पाटात फेकून दिले. तसेच अपहरणकर्त्यांची एक स्कॉर्पिओ बंद पडल्याने त्यांनी ती अंतरवाली शिवारात पाटात ढकलून दिली व अन्य एका स्कॉर्पिओमधून पोबारा केला. ही घटना बुधवारी रात्री घडली असून, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. कैलास शिंगटे (रा. मादळमोही) असे अपहरण केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
- काय आहे प्रकरण?
याबाबत माहिती अशी की, मादळमोही येथील व्यावसायिक कैलास शिंगटे यांच्या दुचाकीला बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास पाठीमागून आलेल्या स्कॉर्पिओने धडक दिली. यावेळी स्कॉर्पिओतील अपहरणकर्त्यांनी शिंगटे यांना उचलून स्कॉर्पिओमध्ये टाकले. यानंतर त्यांच्या तोंडात बोळा कोंबून हातपाय बांधले. तसेच डोळ्यावर पट्टी बांधून मारहाण करत तब्बल 2 कोटींची मागणी केली. यावेळी 2 कोटी देण्यास नकार दिल्याने दाबणाने त्यांच्या शरीरावर जखमा केल्या. दरम्यान, वडीगोद्रीजवळील डाव्या कालव्याजवळ सदरील स्कॉर्पिओ बंद पडल्याने ती कालव्यात ढकलून दिली. याठिकाणी शिंगटे यांच्या खिशातील आधार कार्ड, पॅन कार्ड व अन्य काही कागदपत्रे टाकली व अन्य एका स्कॉर्पिओमध्ये शिंगटे यांना टाकून पुढे काही अंतरावर शिंगटे यांना देखील चालत्या स्कॉर्पिओमधून बाहेर फेकले. यावेळी रात्रीचे 9 वाजले होते.
- व्यापाऱ्याला फेकले कालव्यात -
कालव्यात पडलेली स्कॉर्पिओ काही जणांच्या निदर्शनास आल्यानंतर याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली. तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, सदरील ठिकाणी शिंगटे यांचे काही कागदपत्रे आढळून आले. त्यानुसार शिंगटे यांच्या कुटूंबाशी संपर्क साधला असता, त्यांची दुचाकी साठेवाडी याठिकाणी असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तर काही वेळात शिंगटे यांचा त्यांच्या वडिलांना फोन गेल्यानंतर त्यांनी घडलेल्या घटनेची आपबीती सांगून मी वडीगोद्रीजवळ असलेल्या एका हाँटेलवर असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांना माहिती देताच त्याठिकाणी पोलिसांनी धाव घेतली. याप्रकरणी शिंगटे यांचा गोंदी पोलिसांनी जवाब नोंदवला असून, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा चकलांबा पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती असून, चकलांबा पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करणार आहेत.
- 2 कोटींची मागितली होती खंडणी -
शिंगटे यांचे अपहरण केल्यानंतर त्यांच्याकडे खंडणीखोरांनी 2 कोटींची मागणी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, खंडेणीखोरांना खंडणीच घ्यायची होती, तर शिंगटे यांना त्यांनी रस्त्यात फेकून का दिले?, बंद पडलेली स्कॉर्पिओ कोणाची आहे?, खंडणीखोर हे हिंदीत बोलत होते, त्यामुळे ते कुठले रहिवासी आहेत?, खंडणीखोरांना खंडणीच घ्यायची होती तर त्यांनी शिंगटे यांच्या शरीरावर दाभनाने जखमा करत त्यांना जखमी का केले? असे एक ना अनेक प्रश्न या घटनेवरून उपस्थित होत असून, तपासाअंती या सर्व प्रश्नांची उत्तरे समोर येतील.