भोकरदन (जालना)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यांपासून देशात लॉकडाऊन आहे. दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत भाजीपाला, फळविक्रीसह काही दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र या सवलतीच्या काळात शहरातील नागरिक गर्दी करीत आहे.
भाजीपाला विक्रेते सोशल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडवीत ठिकठिकाणी गर्दी करीत आहेत . परिणामी भोकरदन शहरात लाॅकडाउन असल्याचे जाणवत नाही. शहरात मुख्य बाजारपेठांसह रस्त्यांवर लॉकडाऊन असूनही नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. नागरिक किराणामालापासून कपडा खरेदीपर्यंत सर्वच दुकानांवर रांगा लावत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे भान ठेवले जात नाही.
सर्व परिस्थिती पाहता संचारबंदी कागदावरच असल्याचे दृश्य दिसून येत आहे. तालुक्यात मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून प्रारंभ झालेल्या संचारबंदीत सुरुवातीचे काही दिवस नागरिक व पोलीस प्रशासनाने संचारबंदीचे काटेकोरपणे पालन केले. गेले मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून पोलीस व नागरिकांना संचारबंदी व कोरोनाचा विसर पडल्याचे दिसत आहे. सोमवारी मुख्य बाजारपेठेत जवळपास प्रत्येक दुकानात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. शिवाजी चौकात ट्रॅफिक जॅमचा अनुभवदेखील नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. देशपातळीवर आणि राज्यातही चौथ्या लॉकडाऊननंतर अनलाॅकची घोषणा करण्यात आली असली तरी भोकरदनमध्ये शहरातील दुकाने आणि कार्यालये बहुतांश उघडले आहेत. वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.