जालना - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन स्त्रोतांपैकी एक असलेल्या घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशय आजही कोरडाठाक आहे. पावसाळ्याला सुरुवात होऊन तब्बल दोन महिने झाले मात्र, या तलावात एक थेंबही पाणी आले नाही. एकीकडे पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हैदोस घातला असून दुसरीकडे मराठवाड्यावर अजूनही वरुणराजाची कृपा होताना दिसत नाही.
गेल्या सहा महिन्यांपासून हा तलाव कोरडाठाक आहे. परंतु, मध्यंतरीच्या काळात या तलावातील गाळ काढण्याचे काम शासन आणि सामाजिक संस्थांच्यावतीने करण्यात आले. त्यामुळे येथे झालेल्या खड्ड्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे किमान जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे परिसरातील जनावरे पाणी पिण्यासाठी येथे येत आहेत. तसेच तलाव पूर्णपणे कोरडा असल्यामुळे येथे आलेल्या गवतामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. मात्र, माणसांच्या पिण्याच्या पाण्याचे काय ?असा प्रश्न आजही कायम आहे.
या जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अद्यापपर्यंत जलाशयात एक थेंबही पाणीसाठा नाही. या जलाशयात पाणीसाठा होऊन हे पाणी जालन्याकडे झेपावण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे. तसेच हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहण्यासाठी साडेसतरा फूट पाणी तलावात येणे गरजेचे आहे. मात्र, अजून एक थेंबही पाणी आले नाही. पावसाळ्याचे दोन महिने संपले आहेत, त्यामुळे जालनाकरांची चिंता वाढली आहे.