जालना - जिल्ह्यामध्ये covid-19 च्या रूग्ण संख्येमध्ये भर पडत आहे. याला आळा घालण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये तूर्तास लॉक डाऊन नाही. मात्र, गुरुवारी या विषयावर पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली.
मंगळवारपासून हे राहणार बंद -
ज्या ठिकाणी तोंडावरचा मास्क काढावा लागतो अशा प्रकारची सर्व व्यवस्थापने उद्यापासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये चहाची दुकाने भेळपुरी, पाणीपुरी गाडे, छोटी हॉटेल्स, अशा व्यवस्थापनाचा समावेश आहे. परंतू ज्या हॉटेल मध्ये स्वतंत्र स्वयंपाक गृह आहे, अशा लॉजिंग अँड बोर्डिंग ची व्यवस्था असलेल्या हॉटेलला यामधून वगळण्यात आले आहे. अशा हॉटेल्समध्ये थांबणारे ग्राहक हे सामान्य माणसांच्या तुलनेमध्ये जनसंपरकामध्ये कमी येतात. आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन ते राहतात. स्वयंपाक गृहात येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळही कमी असते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या विविध कारखान्यांमध्ये covid 19 ची तपासणी बंधनकारक करण्यात आले आहे.
शुक्रवार पासून लॉक डाऊनची शक्यता -
आज जरी सर्वांनी लॉक डाऊनला विरोध केला असला तरी, शुक्रवारपासून तीन दिवसाचा लॉकडाउन जाहीर करावा अशा सूचनाही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बैठकीत केल्या. त्यामुळे शुक्रवार, शनिवार, रविवार, असा तीन दिवसाचा लॉक डाऊन लागण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तवली आहे.