बदनापूर - होळीनंतरची धुळवड सगळीकडे उत्साहात साजरी होते. मात्र, बंजारा समाजातील होळी हे खास आकर्षण आहे. होळी आणि धुळवड बंजारा समाजात आगळ्यावेगळ्या पद्धतीने होळी साजरी करण्यात येते. यंदाच्या होळीलाही समाजातील लोकगीतांनी रंगत आणली. हा होळी उत्सव गुढीपाडव्यापर्यंत चालतो.
बंजारा समाजात होळीचा सण अगदी दिवाळीसारखा साजरा होतो. लोकगीत हे बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे खास आकर्षण. खरे तर होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासून त्यांच्या होळीला सुरुवात होते. या गीतांना 'लेंगीगीत' असे म्हटले जाते. बंजारा समाजाच्या होळीत 'पाल', 'गेर', 'फगवा', 'धुंड' अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात. त्या आजही अस्तित्वात असल्याचे दिसून येते. बंजारा समाजाचा हा होळी उत्सव गुढीपाडव्यापर्यंत चालतो. होळीच्या काळात फेर धरून गायली जाणारी लोकगीते आणि या उत्सवातील महिलांचे स्थान उठावदारपणे पाहण्यास मिळते. होळी धुळवडीत इतरत्र महिलांना फारसे स्थान नसते. पण बंजारा समाजातल्या धुळवडीत महिलांचे विशेष स्थान निश्चितच सुखावून जाणारे आहे. हे स्थान आजही कायम असल्याचे दिसून येत आहे.
धुंडची परंपरा
या बंजारा होळीत अनेक रूढी-परंपरा आहेत. या दिवशी ज्याच्या घरी मुलगा झाला त्याच्याकडे त्या बाळाची धुंड साजरी केली जाते. धोंड म्हणजे घरी मुलगा झाल्यावर साजरा केलेला आनंदोत्सव यावेळी तांड्यातील सर्वांना गोड-धोड खायला दिले जाते.
पहाटे चारला पेटते होळी
बंजारा समाजाची होळी आपल्या पारंपरिक होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. पारंपरिक आणि बंजारा समाजाच्या होळी मधला महत्त्वाचा फरक म्हणजे या समाजात पहाटे चार वाजता होळी पेटवली जाते.
विवाहेच्छुक मुले जमवतात लाकडे
या वर्षात ज्यांचे लग्न करायचे आहे अशी उपवर मुले होळीसाठी लाकडे जमा करतात. त्या उपवर मुलांना 'गेरीया' असं म्हटलं जातं.