जळगाव - जिल्ह्यातील रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात गुरुवारी झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस व चक्रीवादळामुळे 2 हजार हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान झाले. तर दोन्ही तालुक्यातील सुमारे 700 घरांची वादळामुळे पडझड झाली आहे. सर्वाधिक नुकसान मुक्ताईनगरात झाले आहे. दरम्यान, महसूल व कृषी विभागाच्या वतीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू आहेत.
रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात गुरुवारी झालेल्या चक्रीवादळामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. वादळामुळे तापी व पूर्णा पट्ट्यातील केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापणीवर आलेली केळी जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात सुमारे 1300 रावेर तालुक्यातील 758 अशा एकूण 2058 हेक्टरवरील केळी बागा भुईसपाट झाल्या असून, सुमारे 200 ते 250 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल व कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये वर्तवण्यात आला आहे. अजूनही अनेक गावांमध्ये पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा - जळगावात वादळी पावसाचे थैमान, नुकसानग्रस्त भागांची लोकप्रतिनिधींकडून पाहणी
महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान -
चक्रीवादळामुळे ठिकठिकाणी विजेचे खांब, रोहित्र कोसळले आहेत. रावेर तालुक्यातील 29 तर मुक्ताईनगर तालुक्यातील 31 गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत.
अनेकांच्या घरांचे नुकसान -
पाऊस आणि चक्रीवादळामुळे रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांचे नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यातील धामोडी या गावात 200 पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे कोळदा, खिर्डी खुर्द, ऐनपूर, सुलवाडी, खिर्डी बुद्रुक, निंभोरा सिम, निंबोल, विटवा, नांदूरखेडा, शिंगाडी, रेंभोटा, वाघाडी या गावांमध्येही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढोळदे या गावात दीडशेपेक्षा अधिक घरे उद्ध्वस्त झाली. याशिवाय अंतुर्ली, उचंदा, कर्की या ठिकाणी नुकसान झाले आहे.
हेही वाचा - जळगाव : 'म्युकरमायकोसिस'वरील औषधे जिल्ह्यातच उपलब्ध करून देऊ - गुलाबराव पाटील